Rahul Gandhi & Sudhir Mungantiwar. Sarkarnama
विदर्भ

Chandrapur BJP : महायुतीची पक्की मोट बांधण्यात मुनगंटीवार ठरले यशस्वी

संदीप रायपूरे

Rahul Gandhi : काँग्रेसचे व अन्य विरोधी राजकीय पक्षांचे जे लोक शिल्लक आहेत त्यांच्याविरोधात एकजुटीने लढण्याची गरज आहे. आपल्या एकीची ताकद ही लाखमोलाची ठरणार आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कायम मुक्काम करीत ठाण मांडले तरी त्यांना काहीच कमाल करता येणार नाही, अशी टीका राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपुरात महायुतीच्या आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. विदर्भात महायुतीचा कार्यकर्ता मेळावा एकाच दिवशी सगळीकडे आयोजिण्यात आला. अनेक जिल्ह्यांतील मेळाव्यांमध्ये उमेदवारी, गट-तट यावरून महायुतीत मतमतांतरे पाहायला मिळाली. मात्र चंद्रपूर येथील मेळाव्यात सुधीर मुनगंटीवार यांना केवळ भाजपचीच नव्हे, तर महायुतीमधील प्रत्येक घटकपक्षाची पक्की मोट बांधण्यात यश मिळाल्याचे स्पष्टपणे जाणवले.

मुनगंटीवार म्हणाले की, काँग्रेसच्या उमेदवाराला निवडणुकीत जागा जिंकता येणार नाही. राहुल गांधींचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. राहुल गांधी जिथे जातात तिथे काँग्रेसचा पराभव होतो. महायुतीमधील घटकपक्षांच्या या महामेळाव्यात भाजपनेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदी पक्षातील विविध नेत्यांची उपस्थिती होती.

एसएफपीचे गणित यावेळी मुनगंटीवार यांनी समजावून सांगितले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचा एस, फडणवीसांचा एफ व पवारांचा पी म्हणजे ‘सुपरफास्ट प्रोग्रेस’ आहे. राज्यात विकासाचा झंझावात सुरू आहे. त्यामुळे पुन्हा नव्या दमाने कार्यकर्त्यांनी मिळून राज्याला नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. महायुतीला महाराष्ट्रातील संपूर्ण लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत. विरोधी पक्षांकडे कुठलाही विचार नाही. त्यांच्याकडे विकासाचा जाहीरनामाही नाही. सध्या विविध मुद्द्यांना घेत विरोधी पक्षाकडून विषारी प्रचार केला जात आहे. हा प्रचार व्यवस्थेसाठी अतिशय घातक आहे. अशा विषारी प्रचाराला सत्यावर आधारित उत्तर देण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, शिवसेना जिल्हाप्रुमख बंडू हजारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष गौतम तोडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे हरिश दुर्योधन आदी यावेळी उपस्थित होते. घटकपक्षातील नेत्यांनीही आपल्या भाषणादरम्यान काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर तीव्र टीका केली. आगामी काळात राज्यात आणि केंद्रात महायुतीचा विजय होईल, असा विश्वासही सर्वांनी व्यक्त केला.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT