Sunil Kedar and Soniya Gandhi
Sunil Kedar and Soniya Gandhi Sarkarnama
विदर्भ

सर्वात मोठ्या चरख्यासाठी सुनील केदारांचे सोनिया गांधींना साकडे..

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे येथे येण्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी कॉंग्रेस (Congress) हायकमांड सोनिया गांधी यांना साकडे घातले आहे.

सुनील केदार (Sunil Kedar) यांनी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांची नवी दिल्ली स्थित १० जनपथ येथे भेट घेऊन त्यांना सेवाग्राम वर्धा येथे येण्याचे निमंत्रण दिले आहे. सेवाग्राम स्थित चरखा भवन येथील १२ फूट उंचीच्या लाकडी चरख्याची सर्वात मोठा चरखा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली आहे. या चरख्याच्या उद्घाटन समारंभाकरिता सुनील केदार यांनी सोनिया गांधी यांना निमंत्रण दिले आहे.

या भेटीदरम्यान सुनील केदार यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील संपूर्ण लेखा जोखा श्रीमती सोनिया गांधी यांच्यासमोर मांडला. यावेळी सोनिया गांधी यांनीसुद्धा सुनील केदार यांच्या कामावर समाधान व्यक्त केले. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुनील केदार यांनी पालकमंत्री म्हणून कर्तव्य पार पाडत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण कामाविषयी श्रीमती गांधी यांच्याशी चर्चा केली. महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सेवाग्राम स्थित सर्व सेवा संघाच्या माध्यमातून काँग्रेसी विचारधारेला पुन्हा जनसामान्यांत रुजवून जमिनी स्तरावर काँग्रेस पक्षाला मजबूत करता येईल, याबद्दल मंत्री केदार यांनी विस्तृतपणे माहिती सोनिया गांधी यांना दिली.

या बैठकीदरम्यान काँग्रेसच्या पक्ष प्रमुख सोनिया गांधी यांनी सुनील केदार यांच्या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद दिला व त्यांच्या कामावर संतोष व्यक्त केला. कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील नेते पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, मदत, पुनर्वसन व ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार, महाराष्ट्रातले कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर आदी नेते हे आपआपल्या पातळीवर पक्षाला मजबूत करण्याचे काम करताना दिसतात. नाना पटोले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पक्षात एक नवीन ऊर्जा संचारल्यासारखी दिसते. पण या नेत्यांनी हायकमांडकडून किती प्रमाणात प्रतिसाद मिळतो, यावर कॉंग्रेसचे पुढील भवितव्य अवलंबून आहे. आजही कॉंग्रेसचे कार्यकर्ते दिल्लीत गेल्यावर १० जनपथची मंडळी दोन-दोन तीन-तीन दिवस भेटत नसल्याचे कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे दिल्लीतून मिळणारा प्रतिसाद महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे भवितव्य ठरवणार असल्याचेही काही कॉंग्रेसी खासगीत सांगतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT