ajit pawar
ajit pawar sarkarnama
विदर्भ

शिंदे-फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची अडचण महाराष्ट्राला एकदा सांगूनच टाकावी : अजित पवार

सरकारनामा ब्यूरो

हिंगोली : मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत काय अडचण आहे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोघांनाच माहिती आहे. या दोघांशिवाय कोणालाही माहिती नाही. आमची अशी अशी अडचण आहे, त्यामुळे आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू शकत नाही. असे या दोघांनी राज्यातील जनतेला सांगावे. पण, त्यांच्या अडचणींमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. पूरग्रस्त भागातील लोकांचं नुकसान होत आहे, त्यांची अडचण होत आहे, याकडे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीसांना ठणकावून सांगितले. (Tell Maharashtra once about problem regarding cabinet expansion : Ajit Pawar)

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील नुकसानीची विरोधी पक्षनेते अजित पवार पाहणी केली. त्यानंतर माध्यमाशी बोलताना त्यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरून नव्या सरकारला धारेवर धरले. या वेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, वसमतचे आमदार राजू नवघरे व इतर उपस्थित होते

ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात पालकमंत्री नेमावेत आणि त्यांनाही कामाला लागावे. कारण एवढ्या मोठ्या महाराष्ट्राचा कारभार पाहताना वेगवेगळे सहकारी जोडीला असतील तर संबंधितांवर त्या त्या विभागाची जबाबदारी आणि सोबतीला पालकमंत्र्यांची जबाबदारी दिली तर कामाचा वेग वाढेल. लोकांचे प्रश्न सुटतील. शेतकऱ्यांना सरकार म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी मंत्र्यांना भेटता येईल. अशा पद्धतीने त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत. पण काय त्यांची अडचण आहे, हे शिंदे-फडणवीस या दोघांनाच माहिती आहे. पण, त्यांच्या अडचणींमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. पूरग्रस्त भागातील लोकांचं नुकसान होत आहे, त्यांची अडचण निर्माण झाली आहे.

पावसाच्या पाण्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे झाले आहेत. मात्र, या शेतकऱ्यांना तातडीने मदत होणे गरजेचे आहे. उभी पिके जी आहेत, त्यातून शेतकऱ्यांच्या हातात काहीही लागणारं नाही. जोपर्यंत शेतातील पाणी हटत नाही; तोपर्यंत शेतकऱ्यांना काहीही करता येणार नाही. वाफसा येण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडेल, त्यानंतर मशागत करावी लागेल. दुबार पेरणीत रब्बीचं पिक घ्यावं लागेल. दुबार पेरणीसाठी सरकारने शेतकऱ्यांना मोफत बियाणं द्यावं. सोयाबीन, कापूस, तूर पिकाला हेक्टरी ७५ हजार रुपये मदत झाली पाहिजे. केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत करावी लागेल, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. कालच माहूर परिसरात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. निर्णय सरकार घेईना, त्यामुळे शेतकऱ्यांची सहनशीलता संपलेली आहे. त्यामुळे ते आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेत आहे. सरकारने सर्व बाजूला ठेवून पहिल्यांदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे. तशी मदत होताना दिसत नाही. घोषणा होतात, जाहीर केले जाते. पंचनामे झाले. मात्र, प्रत्यक्ष मदत मिळत नाही. त्यामुळे माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत करा. शेतकऱ्यांचा अंत आता पाहू नका.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT