Dr. Ashish Deshmukh with MP Dr. Shashi Tharoor
Dr. Ashish Deshmukh with MP Dr. Shashi Tharoor Sarkarnama
विदर्भ

Shashi Tharoor : थरूर यांनी सुनावले; म्हणाले, कॉंग्रेस केवळ ज्येष्ठ नेत्यांचाच पक्ष नाही, तर…

Atul Mehere

नागपूर : ज्येष्ठ नेत्यांचा आम्ही सन्मान करतो. पण आता युवा नेते, कार्यकर्त्यांनाही सन्मान देण्याची वेळ आली आहे. हा केवळ ज्येष्ठ नेत्यांचाच पक्ष नाही, तर युवा नेते आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचाही पक्ष आहे. सद्यःस्थितीत प्रदेश अध्यक्षाच्या वरती दोन-दोन सचिव आहेत आणि जिल्हाध्यक्षांचीही निवड करायची असेल तर वरिष्ठांची सही घ्यावी लागते. ही प्रक्रिया आता सोपी करायची आहे, असे कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार खासदार डॉ. शशी थरूर म्हणाले.

नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) आगमन होताच सर्वप्रथम त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कॉंग्रेस नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) त्यांच्यासोबत होते. मोठा नेता असो किंवा साधारण कार्यकर्ता त्यांचे मत एकाच दिवशी पडणार आहे. त्यामुळे मतमोजणीनंतर बघुया काय होते ते, असे थरूर म्हणाले. निवडणुकीच्या दिवसापर्यंत आपण खरगेंना समर्थन देऊन निवडणूक अविरोध तर नाही होणार ना, असे विचारले असता, येवढ्या मोठ्या संख्येने लोक माझ्या समर्थनार्थ आलेले आहेत. त्यांनी आग्रहाने मला निवडणुकीत उभे राहायला सांगितले आहे. त्यांच्या भावनांची प्रतारणा मी नाही करू शकणार. त्यामुळे तुम्ही म्हणता तसे काहीही होणार नाही, असे खासदार थरूर (MP. Dr. Shashi Tharoor) म्हणाले.

पक्षातले सर्व ज्येष्ठ नेते चांगले लोक आहेत आणि सर्वजण माझे मित्रदेखील आहेत. त्या सर्वांशी मित्रता निभावतो. यामध्ये गेलहोत, दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्वच नेत्यांचा समावेश आहे. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. आमच्यात काही युद्ध होणार नाहीये, तर विचारधारेची ही निवडणूक आहे आणि माझी विचारधारा आज सर्वांसमोर आहे, असे खासदार थरूर म्हणाले.

नागपुरात विमानातून उतरल्यानंतर सर्वप्रथम मी दीक्षाभूमीला आलो. त्यामुळे नागपुरात येऊन मी खूप आनंदी आहे. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मी निवडणूक लढत आहे. आमच्या पक्षाने अनुसूचित जाती, जमातींसाठी सर्वप्रथम काम सुरू केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा ड्राफ्टींग कमिटीचे अध्यक्ष झाले, तेव्हा कॉंग्रेसचे समर्थन घेऊन त्यांनी संविधान लिहिण्याचे काम हाती घेतले. आज माझ्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. हे पुस्तक मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर लिहिले आहे. या पुस्तकात केवळ २०० पानांमध्ये अगदी संक्षिप्त स्वरूपात त्यांचे आयुष्य, अनुभव आणि त्यांनी जो वारसा आम्हाला दिला आहे, त्यावर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाची प्रथम प्रत मी दीक्षाभूमी ट्रस्टच्या प्रतिनिधींना दिली आहे, असे शशी थरूर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT