Akola Political News Sarkarnama
विदर्भ

Akola Political News : उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आमदाराच्या भाषणात विघ्न आणणाऱ्या शेतकऱ्याने सांगितले...

जयेश विनायकराव गावंडे

Akola News : कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या अनुदानाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बुधवारी (ता. 27) अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका शेतकऱ्यांने यावर आक्रमक भूमिका घेतल्याने विरोधकांकडून या विषयाचे भांडवल होण्याची चिन्हे आहेत.

डॉ. पंजाबराव देशमुख (Panjabrao Deshmukh Programme) यांच्या जयंतीनिमित्त कृषी विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. या कार्यक्रमात अकोला पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर भाषण करीत होते. त्यावेळी 50 हजार रुपयांच्या अनुदानाचा विषय त्यांच्या भाषणात येताच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका शेतकऱ्याने आक्रमक भूमिका घेतली.

आम्हाला अनुदान मिळालेच नाही, असे या शेतकऱ्याने आमदार सावरकर यांचे भाषण सुरू असताना ओरडून सांगितले. त्यामुळे पोलिसांनी या शेतकऱ्याला तातडीने ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या शेतकऱ्याने वस्तुस्थिती कथन केली. रामू भागवत केंद्रे हे आमदाराच्या भाषणात विघ्न आणणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. केंद्रे हे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या केळी गावातील रहिवासी आहेत.

रामू केंद्रे म्हणाले, आमच्या गावातील सर्वच शेतकऱ्यांनी कर्जाची नियमित परतफेड केली आहे. परंतु आमच्यापैकी कुणालाही 50 हजार रुपयांचे अनुदान मिळालेले नाही. कृषी विद्यापीठात अॅग्राटेक प्रदर्शन असल्याने आपण येथे आलो होतो. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमासाठी आपण थांबलो. परंतु व्यासपीठावरून भाषण करणाऱ्यांनी सर्वच शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळाल्याचे जाहीर केले. ही वस्तुस्थिती नाही. त्यामुळे आपण भाषण उभे राहात केवळ अनुदान मिळाले नाही, एवढेच सांगितले. त्यानंतर आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी रामू यांना ताब्यात घेताच त्यांच्या आसपास अनेक शेतकरी जमले, हे सर्व शेतकरी वेगवेगळ्या गावातील होते. त्यांनीही कर्जाची नियमित परतफेड करून ही अनुदानाचे 50 हजार रुपये मिळाले नसल्याची तक्रार केली. त्यामुळे प्रशासन, शासन यंत्रणा राज्यकर्त्यांची दिशाभूल करत आहे, राज्यकर्ते मुद्दाम हे मुद्दे वाढवून सांगत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशातच उपमुख्यमंत्र्यांसमोर घडलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अलिकडेच काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या (Farmers) मुद्द्यांवर विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलने झाली आहेत.

बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ येथील आंदोलने तोडफोडीपर्यंत पोहोचली. पीक विमा, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, अनुदानाची रक्कम याच मुद्द्यावर ही आंदोलने सुरू आहेत. अशात रामू केंद्रे या शेतकऱ्याने प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केलेला संताप गांभीर्याने घेत सरकारी यंत्रणेने पुन्हा एकदा आपली कार्यशैली तपासण्याची गरज व्यक्त होत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT