Vidarbha News  Sarkarnama
विदर्भ

Vidarbha News : सत्ताधारी आमदारच देतो बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; एवढी उद्विग्नतेची वेळ का येते ?

Chetan Zadpe

Vidarbha News : राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर होती तेव्हापासून विदर्भातील बुलडाणा जिल्हा चांगलाच चर्चेत राहिला आहे. महाविकास आघाडीत सत्तेवर असताना आणि आता भाजपसोबत गेल्यानंतर बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानांमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. सत्ताधारी आमदारानेच बॉम्बस्फोट घडविण्याच्या दिलेल्या धमकीमुळे आता राजकीय वर्तुळात धमाका उडाला आहे. (Latest Marathi News)

"बुलडाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव ते पंढरपूर यांना जोडणारा महामार्ग २०१८-१९ मध्ये तयार करण्यात आला. या मार्गाचे कालांतराने सिमेंटीकरण करण्यात आले. शेगावच्या पालखीचा मार्ग म्हणून, या मार्गाला ओळखण्यात येते. परंतु, बांधकामाला सुरुवात होऊन पाच वर्षांचा काळ लोटला तरी मार्गाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. रस्ता अपूर्ण असल्याने या मार्गावरील सिमेंटच्या थराला मोठ्या भेगा पडल्या आहेत. भेगा असलेल्या या मार्गावरून त्यावरून ये-जा करणाऱ्या अनेक वाहनांना आतापर्यंत अपघात घडले आहेत. ‘समृद्धी’प्रमाणेच हा मार्गही अपघातांचा सापळा ठरतोय.

या मार्गाच्या निर्मितीसाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु रस्ता निर्मितीचे सर्व निकष धाब्यावर बसवित सिमेंटीकरण करण्यात आल्याचा मेहकर मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांचा आरोप आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या काळातही आमदार रायमुलकर यांनी या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित करण्यावरच न थांबता आमदार रायमुलकर यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली. कंत्राटदारालाही रस्ता नीट करण्याचा सल्ला दिला. परंतु, राज्याची धुरा एकनाथ शिंदे यांच्या हाती असतानाही आमदार रायमुलकर यांचं कुणी ऐकेनासे करू लागलं.

विधिमंडळातील प्रश्नावरून कोणतंही उत्तर मिळालं नाही. अधिकाऱ्यांनी तक्रारीला केराची टोपली दाखवली आणि कंत्राटदार तर जुमानतच नसल्याने अखेर आमदार संजय रायमुलकर यांनी आता टोकाची भूमिकाच घेतली आहे. अधिकारी व कंत्राटदाराने शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाचे काम पूर्ण करून निकषांच्या आधारे रस्ता तयार केला नाही, तर या मार्गावरील प्रत्येक भेगांमध्ये बारुद, जिलेटिनच्या नळकांड्या बसवून बॉम्बस्फोट करून रस्ता उडवून टाकू, असा धमकीवजा ईशाराच आमदार रायमुलकर यांनी दिला आहे.

राज्यात सध्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं ‘ट्रिपल इंजिन’ सरकार सत्तेवर आहे. असं असतानाही एका सत्ताधारी आमदाराला केवळ एका रस्त्याच्या कामासाठी बॉम्बस्फोट घडवू, अशी धमकी देण्याची वेळ येत असेल तर तिथे सामान्यांची काय गत असेल, अशी टीका आता विरोधी पक्षातील नेत्यांनी सुरू केली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT