Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

Sudhir Mungantiwar : वेदमंत्रांपेक्षाही शहिदांच्या ओठांतून निघालेले शब्द आम्हांला प्रिय

अतुल मेहेरे

नागपूर : शासकीय कार्यालयांमध्ये आणि इतरही सर्व नागरिकांनी दूरध्वनी किंवा भ्रमणध्वीवर बोलण्याची सुरुवात करताना ‘हॅलो नव्हे, तर वंदे मातरम्’ म्हणा, या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ आज गांधी जयंती दिनी, त्यांचीच भूमी म्हणजे वर्धा येथून होत आहे.

वनमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविले जात आहे. आजच्या शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री नारायण राणे, (Narayan Rane) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, (Radhakrishna Vikhe Patil) वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, विशेष मार्गदर्शक जलपुरूष मॅंगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. राजेंद्र सिंग, खासदार रामदास तडस, आमदार नागोराव गाणार, आमदार रामदास आंबटकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार रणजीत कांबळे, आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, आमदार पंकज भोयर यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहे.

या अभियानासंदर्भात ‘सरकारनामा’शी बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘हॅलो नव्हे, वंदे मातरम्..’ हे एक अभियान आहे. या अभियानात कुणावरही जबरदस्त नाही. वंदे मातरम् हा स्वातंत्र्याचा मंत्र होता आणि आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या विषयाला भारत मातेच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण करून देत आहोत. दूरध्वनी किंवा भ्रमणध्वीवर बोलताना ‘वंदे मातरम्’ उच्चारायचे आहे. हे केवळ दोन साधे शब्द नाहीत, तर ऊर्जा व स्फूर्ती देणारे हे शब्द आहेत. हे माते मी तुला प्रणाम करतो, असा या शब्दांचा अर्थ आहे.

भारताच्या राज्यघटनेत नागरिकांचे मूलभूत कर्तव्य कलम ५१ मध्ये राष्ट्रीय गाण्याचा सन्मान करावा, असे सांगितले आहे. इंग्रजांनी ‘वंदे मातरम्’ वर बंदी घातली होती. २४ जानेवारी १९५०ला वंदे मातरम् गीताच्या या कडव्याला संविधान सभेने मान्यता दिली आहे. नुसतीच मान्यता दिली असे नाही, तर राष्ट्रगीताच्या बरोबरीचा दर्जा वंदे मातरम् ला देण्यात आला. गांधीजीसुद्धा बोलण्याची सुरुवात ‘वंदे मातरम्’नेच करायचे. मातृभूमीला कधीही अंतर देता कामा नये, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९३७ साली हरिजनमध्ये लिहिले आहे आणि एस.एन. शाहू यांनी हे आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.

‘मातृभूमी से बढकर कोई चंदन नही होता और वंदे मातरम् से बढकर मातृभूमी को कोई वंदन नही होता.’, हे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य प्रसिद्ध आहे. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्. वंदे मातरम् हे गीत नाही, तर ही राष्ट्र आराधना आहे. देवाच्या मुखातून निघालेल्या वेदमंत्रापेक्षाही राष्ट्रभक्त शहिदांच्या ओठांतून निघालेले ‘वंदे मातरम्’ हे शब्द आम्हाला प्राणप्रिय आहेत. हे शब्द म्हणजे भूमीला नमन, वंदन आहे. यातून संकल्प करण्याची ऊर्जा मिळते. स्वातंत्र्य लढ्यात ऊर्जा देणारे हे शब्द, स्वातंत्र्य ते सुराज्य या दिशेने प्रवास करण्याची शक्ती देतात, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

आज वर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन, वंदे मातरम् अभियानाचे उद्घाटन राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५३ व्या जयंती वर्षानिमित्त सेवा पंधरवाड्याचा समारोप, नदीला जाणून घेऊ या - ७५ नद्यांची परिक्रमा, एमगिरी असे चार कार्यक्रम असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT