Atul Save Sarkarnama
विदर्भ

Atul Save News : ... म्हणून अतुल सावे यांचा मार्ग बदलण्यात आला !

अभिजीत घोरमारे

Bhandara District Political News : गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे आज भंडारा दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी पाच वाजता तुमसर येथे गोंदियावरून येणाऱ्या ओबीसी जागर यात्रा कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. काेणताही मंत्री जिल्ह्यात आला, तर ताे मुख्यालयी येताे. पण सावे याला अपवाद ठरणार आहेत.

तुमसरला जाण्यासाठी नागपूरवरून भंडारा - वरठी - मोहाडी - तुमसर असा सरळ मार्ग आहे. पण अतुल सावे हे नागपूरवरून तुमसर शहरात रामटेकमार्गे पोहोचणार आहेत. त्यांनी भंडारा शहरात येणे टाळले आहे. याला एक महत्त्वपूर्ण कारण आहे. मार्ग बदलण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना भाग पाडले आहे.

भंडारा शहरातून तुमसरकडे जाणारा मार्ग इतका खराब झाला आहे की, या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून ‘व्हीआयपी मूव्हमेंट’ होणे जिल्ह्याच्या प्रतिष्ठेला किंबहुना जिल्ह्यातील नेत्यांच्या ‘इमेज’ला न शोभणारे आहे. ही नामुष्की टाळण्यासाठी मंत्री अतुल सावे यांना सरळ रामटेक मार्गे बोलावण्याची वेळ स्थानिक भाजप नेते व सार्वजनिक बांधकाम विभागावर आली असल्याचे बोलले जात आहे.

कोणत्याही जिल्ह्यातील गुळगुळीत रस्ते हे त्या जिल्ह्याच्या विकासाची ग्वाही देत असतात. मात्र, हेच रस्ते जर खराब असले तर जिल्हा प्रशासनाचे आणि तेथील स्थानिक नेत्यांची अब्रू वेशीवर टांगली जाते. याची प्रचिती भंडारा जिल्ह्यात येत आहे. या खराब रस्त्यामुळे अतुल सावेंना मार्ग बदलावा लागत आहे. मार्ग बदलून स्थानिक भाजप नेते आणि प्रशासनाने मंत्री महोदयांची गैरसोय तरी टाळली. हेही नसे थोडके.

भंडारा तुमसर-बालाघाट आंतरराज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतर मागील दोन वर्षांपासून रखडले आहे. दोन वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. भंडारा - तुमसर - बपेरा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतराचा प्रस्ताव दाखल केला आहे. परंतु या मार्गाचे अजूनपर्यंत हस्तांतर झाले नाही.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ‘जॉब कार्ड’ नसल्याचे कारण देत पळवाट शोधत आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्ड्यांच्या डागडुजीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असली तरी फक्त खड्ड्यांत मुरूम भरण्याचा सोपस्कार पार पाडणे सुरू आहे. अनेकांच्या अपघाती मृत्यूचे कारण ठरलेल्या या मार्गाचे तांत्रिक अडचणीमुळे हस्तांतरित न झाल्याने आता सार्वजनिक बांधकाम विभागालाच या मार्गाची दुरुस्ती करावी लागणार आहे.

‘अनाथ’ असलेल्या या रस्त्यावरून मंत्री महोदयांना घेऊन जाणे धोक्याचे ठरू नये, किंबहुना आपल्या कामाचे मूल्यमापन होऊ नये, या भीतीपोटी मंत्री महोदयांना रामटेक मार्गाने आणले जात असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT