Dhairyawardha Pundkar and Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Vanchit-INDIA News : 'वंचित'कडून पुन्हा 'त्या' मुद्द्यांची आठवण, इंडिया सारखी गत महाविकास आघाडीची होऊ नये !

जयेश विनायकराव गावंडे

Vanchit-INDIA News : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला. पण अद्यापही जागावाटपाचे घोडे मात्र पुढे सरकले नाही. वंचित आघाडीकडून सातत्याने अटी शर्तींची आठवण दिली जात आहे. आता पुन्हा 'वंचित'कडून 'त्या' 39 मुद्द्यावर चर्चा करून प्रतिसाद द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी ही मागणी केली आहे. अकोल्यात पत्रकारांशी बोलताना पुंडकर म्हणाले, त्या मुद्द्यांवर चर्चा झाली तरच जागावाटपाबाबत विषय पुढे जाईल. महाविकास आघाडीत सामील होण्याकरता वंचित बहुजन आघाडीकडून वारंवार इच्छा व्यक्त केली जात होती. भाजपविरोधात लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं होतं. मात्र, महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांबरोबर वंचितचे असलेले राजकीय मतभेद पाहता हे गणित जुळून येणे कठीण होते.

महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश करून घेण्यात आला. मात्र त्यानंतर वंचितकडून 39 मुद्यांचा समावेश असलेला जाहीरनाम्याचा मसुदा सादर करण्यात आला आहे. या मुद्द्यांमध्ये राज्यातील संवेदनशील मराठा आरक्षणासह 39 मुद्यांचा समावेश आहे. हे मुद्दे वंचितकडून महाविकास आघाडीला 8 फेब्रुवारीला सादर करण्यात आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे मुद्दे देत असताना ज्या मुद्द्यांवर महाविकास आघाडीची असहमती असेल ते वगळावे आणि अधिकचे असतील, तर त्यामध्ये टाकावेत असही या जाहीरनाम्याच्या मसुद्यामध्ये म्हटलं आहे. मात्र अद्यापही महाविकास आघाडीतील तीनही घटकपक्षांकडून या मुद्द्यावर चर्चा झाली नसल्याचं वंचितने म्हटलं आहे. त्यामुळे तीनही पक्षांनी यावर लवकरात लवकर प्रतिसाद द्यावा, अशी आठवण वजा मागणी पुन्हा वंचितकडून महाविकास आघाडीला करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीची गत इंडिया सारखी होऊ नये!

महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला असला तरी अद्यापही तीनही पक्षांकडून त्या 39 मुद्द्यांवरून मतैक्य झालं नसल्याचं 'वंचित'चे म्हणणे आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून अद्यापही वंचित कडून देण्यात आलेल्या मुद्द्यावर चर्चा झाली नाही. या तिन्ही पक्षांनी चर्चा करून आपलं मत ऐक्य करावे आणि तसे आम्हाला कळवावे.

राष्ट्रीय स्तरावर झालेल्या इंडिया आघाडीतून रोज एक घटकपक्ष बाहेर पडत आहे. तसं महाविकास आघाडीचं होऊ नये म्हणून 'त्या' 39 मुद्द्यांवरून आम्हाला प्रतिसाद द्यावा असा इशारा वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिला आहे. या संदर्भात प्रतिसाद मिळाला तर जागावाटप करण्यासाठी चर्चा करता येईल, असेही ते म्हणाले. त्यानंतर आम्हाला पुढील बैठकीत बोलवावे, अशी मागणीही पुंडकर यांनी केली आहे.

आंबेडकरांकडून काँग्रेसवर टीका!

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचण्यात आलं आहे. मराठा आरक्षणाच्या विधेयकावरून आंबेडकर यांनी काँग्रेसला धारेवर धरले आहे. सभागृहात मराठा आरक्षणाच्या विधेयकाला पाठिंबा द्यायचा आणि बाहेर विरोध करायचा हे काँग्रेसचे दुटप्पीपणाचे धोरण असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT