Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar On Talathi Exam : बेरोजगार तरुणांची सरकार थट्टा करतेय; तलाठी परीक्षेत गोंधळ, विजय वडेट्टीवर आक्रमक

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News : तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी एक हजार रुपये शुल्क घेऊनही ऐनपरीक्षेवरी उमेदवारांना सर्व्हर डाऊन असल्याचे सांगण्यात आल्याने सोमवारी राज्यात एकच गोंधळ उडाला आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर सकाळी सातपासून ताटकळत उभे असल्याची स्थिती आहे. यामुळे राज्याचे विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले असून सरकारला इशारा दिला आहे. बेरोजगार तरुणांची सरकार थट्टा करत असल्याचाही आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. परिणामी तलाठी भरती परीक्षेवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

तलाठी भरतीत साडेचार हजार जागांसाठी तब्बल 10 लाख 41 हजार अर्ज आले आहेत. परीक्षेसाठी आकरलेल्या शुल्कावरून अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार Rohit Pawar रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आता मोठ्या प्रमाणात शुल्क घेऊनही विद्यार्थ्यांना ऐनवेळी परीक्षा देता येत नसल्याने वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सर्व्हर डाऊनच्या नावाखाली सरकार बेरोजगार गरीब तरुणांचे एक प्रकारे शोषणच करत असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. या सरकारला शेतकरी, शेतमाल, महागाई आणि त्यांच्या मुलांचे काही देणेघेणे नाही. परीक्षेच्या शुल्काच्या माध्यमातून जमा केलेला २०० कोटींचा निधी कुणाच्या घशात घातला, असा सडेतोड प्रश्नही वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे.

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, "सकाळी सात वाजता सुरू होणारी परीक्षा १० वाजले तरी सुरू झाली नाही. एक हजार फी घेऊनही राज्यभरात परीक्षेसाठी फक्त चारच केंद्र उभे केले. यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात पायपीट, खर्च करावा लागला. ही सर्व मुले शेतकऱ्यांची, मजुरांची असून त्यांना सरकारच्या गलथान कारभारामुळे नाहक खर्चासह त्रासही सहन करावा लागला. मुलांचे जेवण, प्रवास, झोपण्याचेही हाल झाले. चार केंद्र देताना या सरकारला लाज का वाटली नाही. प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र दिले असते तर विद्यार्थ्यांचे हे हाल झाले नसते."

"या गोंधळाअडून शासन बेरोजगारांचे शोषणच करत आहेत. आता या परीक्षा वेळेत झाल्या नाहीत. सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांना उद्या परीक्षा देण्याची वेळ आली तर नव्याने शुल्क घेता कामा नये. ऑनलाईन अर्ज केलेल्या मुलांची प्रवासाची सोयही सरकारनेच करावी. राज्यात फक्त तमाशा सुरू आहे. मोठ्या प्रमाणात फी घेऊनही मुलांना सर्व्हर डाऊनच्या नावाखाली परीक्षा देता येत नसेल तर जमा केलेले पैसे कुणाच्या खात्यावर गेले. यातून नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल", असा इशाराही वडेट्टीवारांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT