Nagpur News, 14 Dec : विधानसभेतील अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे पाप महायुती सरकारचे आहे, असं म्हणत वडेट्टीवार यांनी शेतकरी आत्महत्या, कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिला व बालकांवरील वाढते अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून सरकारवर टीकास्र डागले.
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, 'राज्यात दररोज ८ शेतकरी आत्महत्या करत आहे. अतिवृष्टीने राज्यातील २८ जिल्ह्यांना फटका बसला. सरकारने ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली.पण हे पॅकेज कागदावर राहिलें. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रती हेक्टर १८ हजार ५०० रुपये मदतीचे गाजर दाखवले, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात फक्त ८ हजार ५०० रुपये मिळाले.
कृषी विभागाला ६ हजार कोटी रुपयांची गरज असताना सरकारने शेतकऱ्यांसाठी केवळ ६१६ कोटी रुपये दिले. चार महिन्यांपूर्वी 'कृषी समृद्धी' योजनेची मोठी घोषणा केली, पण आजपर्यंत या योजनेसाठी एका पैशाची तरतूद केलेली नाही. यामुळे विदर्भात होणाऱ्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही. आर्थिक वर्ष संपायला अडीच महिने उरले असताना कृषीसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीच्या केवळ ३४ टक्के निधी खर्च झाला आहे.
आज शेतकऱ्यांचे पिक गेले, त्यांच्या जमिनी खरवडल्या दुसऱ्या बाजूला बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या किमती वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही. बळीराजाची फसवणूक महायुती सरकारने केली आहे. शेतकरी आत्महत्येचे पाप या सरकारचे आहे.'
तर यावेळी त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था बिघडल्याचंही नमूद केलं. राज्यात गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहारांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचारातही राज्याचा क्रमांक पहिला आहे, तर बाल गुन्हेगारीमध्ये राज्य पाचव्या क्रमांकावर आला आहे.
राज्यात दररोज ८ बलात्काराच्या घटना आणि ५१ अपहरणाच्या घटना घडत आहेत. लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित वातावरण नाही. मुंबईत गेल्या ३६ दिवसांत ८२ मुले बेपत्ता झाली, ज्यात मुलींचे प्रमाण अधिक आहे. जून ते डिसेंबर या काळात ३७० अल्पवयीन मुले बेपत्ता झाली असून त्यापैकी २६८ मुली आहेत, अशी आकडेवारी देत त्यांनी सरकारचे वाभाडे काढले.
दरम्यान, राज्यात पोलिस दलात ३३ हजार २२८ पदे रिक्त आहेत. प्रति एक लाख लोकांमागे केवळ १७२ पोलिस आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण असून त्यांना शासकीय निवासस्थानांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे.
राज्यात पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये 'एमडी' ड्रग्सचा विळखा वाढत असून तरुण पिढी बरबाद होत आहे. वाशिम, मालेगाव येथे गुटखा रॅकेट सुरू आहे. त्यावर कारवाई झाली तरी आरोपी सुटतात. यात पोलिसांचे त्यांचेशी साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप देखील वडेट्टीवार यांनी केला.
दरम्यान, नागपुरात अधिवेशन होत असताना विदर्भातील सिंचनाचा बॅकलॉग तातडीने भरून काढावा.धानाला प्रति क्विंटल १हजार रुपये आणि सोयाबीनला प्रति क्विंटल २ हजार रुपये बोनस द्यावा, उद्योगांना सबसिडी देऊन मिहान मध्ये रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन द्यावे. विदर्भातील गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी निधी द्यावा. विदर्भ वैधानिक मंडळाला त्वरित मान्यता द्यावी, अशा विविध मागण्या वडेट्टीवार यांनी अंतिम आठवड्याच्या भाषणात केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.