Sankalp Yatra Rath in Ridhora. Sarkarnama
विदर्भ

Akola : मोदींचा विकसित भारत संकल्प रथ रिधोरा ग्रामस्थांनी अडवला

प्रसन्न जकाते

Ridhora Village : केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी काढण्यात येत असलेला विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ अकोला शहरापासून जवळच असलेल्या रिधाेरा गावातील ग्रामस्थांनी अडविला. संकल्प यात्रेच्या रथावर ‘भारत सरकार’ ऐवजी ‘मोदी सरकार’ लिहिल्याने ग्रामस्थांनी आक्षेप घेत रथ अडविला होता.

सोमवारी (ता. 25) जिल्हा प्रशासनातील काही अधिकारी विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथासह रिधोरा गावात पोहोचले. रथ गावात येताच ग्रामस्थांनी अधिकारी आणि रथाला गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अडविले. रथावर भारत सरकारऐवजी मोदी सरकार का नमूद आहे, असा जाब ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना विचारला.

जिल्हा प्रशासनाकडून ज्या सूचना प्राप्त झाल्या, त्याच्या आधारावर काम करीत असल्याची माहिती यावेळी रथासोबत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. रथावर लिहिलेल्या मोदी सरकार या शब्दातून केवळ एका व्यक्तीचा व विशिष्ट पक्षाचा प्रचार होत आहे. त्यामुळे भारत सरकार असा उल्लेख हवा होता. भारत सरकार असे लिहिले असते तर आपण रथाला सहकार्य केले असते, असे ग्रामस्थांनी सांगितले. तातडीने रथ ग्रामपंचायतीच्या हद्दीतून बाहेर नेण्याची मागणीही अनेकांनी केली.

ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अधिकाऱ्यांची त्यांची समजूत घालताना चांगलीच दमछाक झाली. अखेर याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी तहसीलदारांनी गावात यावे, अशी मागणी करण्यात आली. रथासोबत असलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अकोल्याच्या तहसीलदारांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच तहसीलदार संतोष शिंदे रिधोरा गावाकडे रवाना झालेत. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनाही याबाबत माहिती देण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रिधोरा गाव गाठत ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ आपल्या मागणीवर अडून होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणारा विकसित भारत संकल्प रथ अकोला जिल्ह्यात अडविल्याने यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. अकोल्यातील बहुतांश ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या राजकारणावर वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व आहे. त्यातून हा रथ अडविण्यात आल्याचा आरोप होत आहे, मात्र ‘वंचित’ने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. रथ अडविण्याचा निर्णय हा सर्वस्वी ग्रामस्थांचा होता, असे रिधोरा गावातून सांगण्यात आले. सरकारी रथ अडविल्याने आता याप्रकरणी जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT