Vijay Wadettiwar and Santosh Bangar Sarkarnama
विदर्भ

Wadettiwar VS Bangar : लहान मुलांना दोन दिवस उपाशी राहायला सांगणारा विद्वान, संत महात्मा !

Atul Mehere

Wadettiwar VS Bangar : लहान मुलांच्या समोर काय बोलले पाहिजे, याचे भान प्रत्येकानेच जपले पाहिजे. काल संतोष बांगर लहान मुलांच्या समोर जे काही बोलले, यावरून त्या लोकांना राजकारणाशिवाय काहीही दिसत नाही, हेच सिद्ध होते. मुलांना त्यांच्या भविष्याबद्दल मार्गदर्शन करायचे सोडून मतांसाठी मुलांना दोन दिवस उपाशी राहायला सांगणे म्हणजे हे लोक किती निर्ढावले आहेत, हेच दिसते, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

शनिवारी (ता. 10) वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, लहान मुलांच्या पुढे बोलताना तुमच्या बाबांनी मला मतदान केलं नाही, तर दोन दिवस उपाशी राहा, असं सांगणारा संतोष बांगर मोठा साधू, संत महात्मा आहे. राज्यात नाचक्की चाललीय. मतांचा रोग संतोष बांगरला झालाय. पुढच्या पिढीला करिअरसाठी मार्गदर्शन करायला हवं, ते न करता राजकारणाची भाषा हा माणूस त्यांच्यासमोर बोलतो. हा भोकण्यांचा बाजार राज्यात पसरला आहे. महाराष्ट्राची जनता यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही.

सुब्रमण्यम स्वामी यांनी याचिका केल्याचं कळलं. घटनेतील शब्द वगळावा, अशी त्यांची मागणी आहे. या देशातील सर्वधर्म समभाव संपुष्टात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हिंदू राष्ट्र संकल्पनांवर देश पुढे जाणार नाही, असे सांगताना वडेट्टीवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले. जरांगे पाटील यांनी वारंवार उपोषण करून आधी गुलाल उधळला. मग आता उपोषणाची गरज काय? मराठा आरक्षणाला विरोध नाही. पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, ही आमची भूमिका आहे.

आंदोलन मागे घेताना मनोज जरांगेंना हे कळलं नाही का, जरांगे पाटील यांना सरकारने फसवले का, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. दोन समाज आत्ताच एकमेकांच्या पुढे उभे ठाकले आहेत. ते पुन्हा वाढू नयेत, यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. जरांगे यांना आपल्या समाजासाठी दुसऱ्या समाजाचं वाटोळं करायचे असेल तर असे उपोषण सरकारने आवरावे. आता खूप झालं, जरांगे यांना खूश करण्यासाठी दुसऱ्याच्या ताटातलं सरकारने हिसकावून घेऊ नये, असे वडेट्टीवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांमध्ये असंतोष आहे. पोलिसांची भीती कुणाला राहिली नाही. पोलिस सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाले आहे. यासाठी पोलिसांना संरक्षण, मोकळीक देणं गरजेचं आहे. पोलिस प्रशासन हतबल झाल्यासारखं वाटतंय. कॉंग्रेसचे नेते अनिस अहमद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार गट) वाटेवर असल्याचे विधान अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. याबाबत विचारले असता, अनिस अहमद यांच्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. ते कॉंग्रेस सोडून जाणार नाहीत, असा विश्‍वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT