Wardha-Yavatmal Railway. Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : यवतमाळच्या दौऱ्यात नरेंद्र मोदी देणार मोठे ‘गिफ्ट’

प्रसन्न जकाते

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी चौथ्यांदा यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांचा हा पश्चिम विदर्भ दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आपल्या दौऱ्यात मोदी बचत गटाच्या महिलांशी संवाद साधणार आहे. हा संवाद साधताना कदाचित ते महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठी घोषणा करू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच मोदी वर्धा-यवतमाळ-नांदेड ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे ‘गिफ्ट’ विदर्भाला देणार असल्याचे संकेत आहेत.

वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन ब्रॉडगेज रेल्वे रुळाचे काम यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यापर्यंत पूर्ण झाले आहे. अशातच यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होत आहे. यापूर्वी या लोहमार्गाच्या लोकार्पणाचा सोहळा दोनदा हुकला होता. लोकार्पणाचा सोहळा वर्धा येथे व्हावा, अशी मागणी होत होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील नेत्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळेच सुरू होते, असे आता दिसत आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून रेल्वे विभागाला लोहमार्गाच्या कामाची सद्य:स्थिती विचारण्यात आली होती. लोहमार्ग लोकार्पणाच्या स्थितीत आहे काय, अशी विचारणा आतापर्यंत दोनदा झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रेल्वे विभागाने लोहमार्ग लोकार्पणासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन ब्रॉडगेज लोहमार्गाचे कळंबपर्यंत पहिल्या टप्प्याने लोर्कापण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यवतमाळ हा राज्यातील शेतकऱ्यांचा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे यापूर्वी यवतमाळमध्ये आले असताना त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. आता त्यासंदर्भातही त्यांना भाष्य करावे लागणार आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या संतापाचा बांध फुटला आहे. त्याची प्रचिती केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माजी खासदार हंसराज अहीर आणि यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांना आली आहे.

शेतकऱ्यांचा रोष शांत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळमध्ये नक्कीच मोठी घोषणा करावी लागणार आहे. त्यासोबतच कळंब ते वर्धा या लोहमार्गाचे लोकार्पणही करावे लागणार आहे. कळंब ते यवतमाळ या लोहमार्गावर अद्याप ‘ट्रायल रन’ झालेला नाही. त्यामुळे अवघ्या दोन दिवसात हे असे शक्य होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेज रुपांतराचा प्रश्नही गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे भावना गवळी यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यासाठी नेमके काय केले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

गेली अनेक महिने खासदार भावना गवळी या मतदारसंघातून गायब होत्या. ईडी आणि आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने हे ‘चेंगट’ सोडविण्यासाठी त्या धावपळ करीत होत्या. आता निवडणूक जवळ आल्याने त्या पुन्हा मतदारसंघात सक्रिय झाल्याचे सांगण्यात येत आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड आणि शुकंतला रेल्वेचा प्रश्न मार्गी निघाल्याच पश्चिम विदर्भ लोहमार्गाने थेट मराठवाड्याशी जोडला जाणार आहे. एवढेच नव्हे तर शकुंतला रेल्वेचा प्रश्न निकाली निघाल्यास मुंबईची ‘कनेक्टिव्हिटी’ही यवतमाळकरांना मिळणार आहे. मात्र अद्याप या दोन्ही प्रकल्पांचे काम खटाईत पडले आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT