Nagpur News, 11 Feb : केंद्रात भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष प्रवीण तोगडिया (Pravin Togadia) यांच्यात मोठे मतभेद निर्माण झाले होते. वाद विकोपाला गेल्यानंतर तोगडिया विश्व हिंदू परिषदेतून बाहरे पडले.
त्यांनी आंतराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) स्थापन केली होती. एकाच विचाराच्या दोन संघटना निर्माण झाल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघही नाराज होता. आता तोगडिया यांची समजूत काढण्यात संघाला यश आल्याचे दिसून येत असून दोन्ही संघटना आता एकमेकात विलीन करण्यात येणार असल्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) आणि प्रवीण तोगडिया या संदर्भात दोन वेळा चर्चा झाली आहे. मूळचे स्वयंसेवक असेल्या तोगडिया यांनाही सरसंघचालकांचा शब्द टाळता येणे अवघड असल्याने त्यांनी विलिनीकरणास होकार दिला असल्याचे समजते. सध्या संघ आणि विश्व हिंदू परिषदेने यावर अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही.
मात्र दोन्ही एकाच विचाराच्या आणि एका परिवाराच्या संघटना असल्याने एकत्र यावे अशी इच्छा सर्वांनीच बोलून दाखवली. तोगडिया हे २४ जून २०१८ मध्ये विश्व हिंदू परिषदेपासून वेगळे झाले होते. त्यांनी आंतराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली. विश्व हिंदू परिषदेत तोगडिया यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ते वेगळे झाल्याने अनेकांची अडचण झाली होती.
संघाच्या (RSS) ९९ वर्षांच्या इतिहासात प्रथमच परिवारातील संघटनेचे विभाजन झाले होते. यापूर्वी नाराज झालेले संघटनेतून बाहेर पडले. मात्र यापैकी कोणीही वेगळी संघटना स्थापन केली नव्हती. तोगडिया यांनी देशभर भ्रमण करून विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना आपल्या संघटनेत जोडले होते. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्येही विश्व हिंदू परिषदेतही त्यामुळे फूट पडली होती.
आपसात कुठलेच मतभेद आणि हेतू विषयी शंका नसली तरी कार्यकर्ते विखुरले गेले होते. एकमेकांचा आदर राखून दोन्ही संघटनेचे काम सुरू होते. दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांना सर्वांनी एकत्र यावे अशी इच्छा होती. ती पूर्ण होताना दिसत आहे. प्रवीण तोगडिया यांनी संघाच्या विजया दशमीच्या उत्सवानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.
त्यानंतर पुन्हा त्यांनी आपसात भेट झाली. दोघांनी हिंदूंच्या (Hindu) एकतेसाठी एकत्रित काम करण्याचा संकल्प केला. मोहन भागवत यांनी सर्व हिंदूंना एकत्रित काम करण्याचे आवाहन केले असल्याचे आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेच्यावतीने सांगण्यात आले. सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू आहे. कुंभ आटोपल्यानंतरच एकत्रिकरणाच्या दिशने पाऊल टाकले जाईल असे सांगण्यात येते. डॉ. प्रवीण तोगडिया यांनी या संदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला. सध्या आपण कुंभमेळ्यात व्यस्त आहे. कोट्यवधी लोक कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी येत आहेत.
सध्या त्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी आंतराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेने उचलली आहे. आतापर्यंत लाखो लोकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. एक लाख ब्लँकेट वाटप करण्यात आले. प्रयागराज येथे येणाऱ्या स्वयंसेवकांच्या राहण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. सध्या कुंभाशिवाय दुसरा चर्चेचा विषय आपल्याकडे नसल्याचे तोगडिया यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.