Rahul Narwekar On Sanjay Raut
Rahul Narwekar On Sanjay Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Rahul Narwekar On Sanjay Raut: नार्वेकरांचा राऊतांना खोचक टोला, म्हणाले,''काही लोकांकडून अपेक्षा करणं...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊतांकडून १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला जात आहेत. तसेच राऊतांनी दुर्योधनाच्या बाजूने उभे राहणार असाल तर कायद्याची पदवी पेटीत बंद करून ठेवा अशा शब्दांत खडसावलं होतं. यावर आता नार्वेकरांनी राऊतांना खोचक टोला लगावला आहे.

राहुल नार्वेकर(Rahul Narwekar) यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेवर, प्रतोद नियुक्तीवर भाष्य केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी राऊतांनाही फटकारलं आहे. नार्वेकर म्हणाले, ठाकरे गटाचं कोणतंही निवेदन माझ्याकडे आलेलं नाही. तसेच १६ आमदारांच्या लवकरात लवकर आणि निपक्ष:पातीपणे निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं.

नार्वेकरांचा राऊतांच्या टीकेवर पलटवार...

संसदेच्या सदस्यानं अत्यंत जबाबदारीपूर्वक व संविधानिक पध्दतीनं भाष्य करणं गरजेचं असतं. ज्यावेळी आपण भाष्य करत असतो आणि तेही एका संविधानिक पदावरील व्यक्तीवर करत असतो. तेव्हा जबाबदारीपूर्वक वक्तव्यं करणं अपेक्षित असतं. पण मला वाटतं अशी अपेक्षा काही व्यक्तींकडून करणं व्यर्थ आहे. त्यामुळे अशा लोकांना दुर्लक्षित करणं योग्य आहे. त्यांच्या वक्तव्यांना महत्व न देणं हे आपल्या लोकशाही आणि संविधानाच्या दृष्टीनं योग्य राहील अशा शब्दांत नार्वेकरांनी संजय राऊतांच्या टीकेवर पलटवार केला आहे.

हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा गैरसमज...

मी आपल्याला सांगू इच्छितो की,आजपर्यंत मी कोणत्याही दबावाला बळी पडून काम केलेलं नाही आणि यापुढेही करणार नाही. ज्या लोकांना असं वाटत असेल की, अध्यक्षांवर दबाव आणून, त्यांच्यावर टीका करुन त्यांना धमक्या देऊन आपण त्यांच्याकडून आपल्याला पाहिजे तसा निर्णय घेऊ तर मी आपल्या माध्यामातून त्यांना सांगू इच्छितो की, असं वाटणाऱ्यांच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा गैरसमज असेल, अध्यक्ष कधीही दबावाखाली निर्णय घेणार नाही असा इशाराच नार्वेकरांनी एकप्रकारे ठाकरे गटाला दिला आहे.

ठाकरे गटाचं कोणतंही निवेदन नाही...

तसेच यावेळी नार्वेकरांनी १६ आमदारांच्या अपात्रतेवर आणि गोगावलेंच्या प्रतोद नियुक्ती, व्हिपवर लवकरात लवकर निर्णय़ घेणार आहे. पण हा निर्णय घेतानाच जुलै रोजी २०२२ रोजी कोणता गट हा राजकीय पक्ष प्रतिनिधीत्व करत होता. राजकीय पक्ष नेमका कोणता गट होता याचा सर्वप्रथम निर्णय सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)नं घ्यायला सांगितला आहे.

तसेच हे निश्चित केल्यानंतर त्यांची त्यावेळची इच्छा काय होती, प्रतोद कुणी व्हावं याबाबतची भूमिका काय होती हे त्याला शिफारस करु आणि ते झाल्यानंतर प्रत्येक याचिकेवर सुनावणी घेऊ. माझ्याकडे आत्तापर्यंत एकूण ५ याचिका दाखल झाल्या असल्याची महिती दिली आहे. पण ठाकरे गटाचं आमदारांच्या अपात्रतेबाबतची कोणतंही निवेदन आले नसल्याची स्पष्ट भूमिका नार्वेकर यांनी मांडली.

राऊत काय म्हणाले होते?

संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले, राहुल नार्वेकर कायद्याचे जाणकार आहेत. ते अनेक वर्ष शिवसेनेचेच वकील होते. शिवसेनेच्या माध्यमातूनच त्यांचे राजकारण पुढे गेले. त्यांना शिवसेना काय आहे हे माहिती आहे. काय घडले आहे, कसे घडवले, हे त्यांना माहिती आहे. त्यांना जर दुर्योधनाच्या बाजूने उभे राहायचे असेल, तर त्यांनी त्यांची कायद्याची पदवी पेटीत बंद करून ठेवावी अशी बोचरी टीका त्यांनी केली होती.

अध्यक्षांनी फक्त 'ते' जाहीर करायचे आहे...

न्याय करणे यापेक्षा न्यायाला विरोध करणे घटनाद्रोह आहे. ज्याच्या हातात न्यायाचा तराजू आहे, त्याने न्यायाला विलंब करणे देशद्रोह असतो. या महाभारतामध्ये श्रीकृष्ण नाही. या महाभारतामध्ये भीम नाही. या महाभारतामध्ये भीष्ण पितामह सुद्धा नाही आहेत. ते सगळे तटस्थपणे पाहत आहेत. त्यांनी लढाई चालू ठेवावी. सर्वोच्च न्यायालयाने मेलेल्या पोपटाविषयी भाष्य केलेले आहे. पोपट मेलेलाच आहे. फक्त विधानसभा अध्यक्षांनी ते जाहीर करायचे आहे असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली.

(Edited By Deepak Kulakrni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT