TET Paper Leak Case : महाराष्ट्रात चाललंय काय? टीईटी पेपर ठाण्यात फुटतो आणि नीट पेपरफुटीचे धागेदोरे थेट आपल्या राज्यात सापडतात. परीक्षा कोणतीही असो, पेपर फुटणारच ही या सरकारची ओळख बनली आहे. दिवस-रात्र एक करून अभ्यास करणाऱ्या कष्टकरी परीक्षार्थीच्या भविष्याचा हा उघडउघड खून आहे.
या लाचार सरकारला एक परीक्षा देखील सुरक्षितपणे घेता येत नाही, हेच यातून सिद्ध होतंय. सत्ताधाऱ्यांना केवळ स्वतःच्या खुर्च्या टिकवण्यात रस आहे; महाराष्ट्रातील लाखो परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांच्या वेदनेशी यांना काहीही देणंघेणं नाही. हे सरकारचे ढळढळीत अपयश आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
'जर सरकारला थोडी जरी लाज उरली असेल, तर त्यांनी तात्काळ यावर कायमचा बंदोबस्त करावा. परीक्षार्थीच्या कष्टाचा बाजार मांडणाऱ्या या राज्यकर्त्यांना सत्तेवर बसण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.', असा इशारा देखील त्यांनी दिला.
ही केवळ पेपरफुटी नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची, त्यांच्या कष्टांची आणि त्यांच्या भविष्याची चोरी आहे.सरकारी भरती परीक्षा असो किंवा पात्रता परीक्षा, वारंवार पेपरफुटी होत असताना सरकार मात्र नेहमीप्रमाणे चौकशीच्या घोषणा करण्यातच व्यस्त असते. दरवेळी दोषींवर कारवाई करू असे सांगितले जाते, पण पुढचा पेपर पुन्हा फुटतो. याचा अर्थ दोषींना कायद्याचा धाक राहिलेला नाही किंवा त्यांना कुणाचे तरी संरक्षण मिळत आहे, असे देखील वडेट्टीवार म्हणाले.
आज महाराष्ट्रातील युवक बेरोजगारीच्या संकटाशी झुंज देत आहेत. महायुती सरकारने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हा पेपर नेमका कसा फुटला? त्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे? त्याला राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण आहे का? याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. केवळ लहान-मोठ्या दलालांना अटक करून चालणार नाही, तर या रॅकेटमधील सूत्रधार आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली.