Ajit Pawar, Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sunil Tatkare : अजितदादांच्या आमदारांबाबत शरद पवारांचं सूचक वक्तव्य; पण तटकरे म्हणतात...

Jagdish Patil

Sunil Tatkare On Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत केवळ एका जागेवर विजयी झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

शिवाय काहीही झालं तरी महायुतीत रहायला नको, असंही अजित पवार गटातील आमदार म्हणत असल्याचा दावा विरोधकांकडून सतत केला जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीदेखील फुटलेल्या आमदारांबाबत एक सूचक विधान केलं आहे.

अजित पवार (Ajit Pawar) गटातील काहीजण शरद पवार गटात येण्यास उत्सुक असल्याच्या चर्चांसंदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "पक्षातील इतर माझे सहकारी आहेत. त्यांना विश्वासात घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाईन." पवारांच्या या विधानामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच अजित पवार गटाचे एकमेव खासदार सुनील तटकरे यांनी मात्र विरोधकांचा दावा फेटाळून लावत सगळे आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी अजित पवार गटातील आमदार शरद पवारांबरोबर जाणार असल्याच्या चर्चांवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले. "सगळे आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. कुठलाही आमदार परत माघारी जाणार नाही.", अशा शब्दात तटकरे यांनी विरोधकांचा आणि दावा मोडीत काढला.

तसंच, आमच्यासमोर विधानसभेचे आव्हान आहे. पूर्ण क्षमतेने निवडणुका लढवायच्या आहेत. महायुतीमध्ये समन्वय करून निवडणुका लढवायच्या असून या निवडणुकीचे सारे अवलोकन करत पुढे जायचं आहे, असंही तटकरे म्हणाले.

लोकशाहीचे नियम काँग्रेसने पायदळी तुडवले

दरम्यान, यावेळी त्यांनी काँग्रेसवर (Congress) हल्लाबोल केला. तटकरे म्हणाले, "लोकशाहीचे सगळे नियम काँग्रेसने पायदळी तुडवले आहेत. उपाध्यक्षपद त्यांना दिलं जाणार होतं, पण अध्यक्षपदाच्या बाबतीत काही अटी विरोधी पक्षांनी घातल्या. आमच्याबद्दल अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला लोकांनी जनमत दिल्यामुळे आम्ही शपथ घेऊ शकलो. काँग्रेसने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली, काँग्रेसने काही अटी टाकल्या होत्या, ते योग्य नाही."

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

अजित पवार गटात गेलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात घेतलं जाणार नाही म्हणणाऱ्या शरद पवारांनी आता बंडखोर आमदारांबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. फुटलेल्या आमदारांना परत पक्षात घेणार का? असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, "सरसकट निर्णय घेणं कितपत योग्य आहे? याबाबत मला सांगता येणार नाही.

मात्र, पक्षातील इतर सहकारी आहेत. त्यांना विश्वासात घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाईल. जे इकडे येण्यास इच्छुक आहेत, त्यांचं योगदान आणि भूमिका काय आहे, यावरुन निर्णय घेतला जाईल. अशी सूचक प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT