Nagpur News : कोवीड काळात मुंबई महापालिकेने मोठा भ्रष्टाचार केला आहे. या काळात सर्व टेंडर कोणाला दिले होते, याची चौकशी सुरू आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने प्रत्येक बाबतीत मोठा गैरव्यवहार केला आहे. माझी कुटुंब माझी जबाबदारी जनतेने फिरावे दारोदारी, सर्व टेंडर सोयऱ्याच्या दारी, अशा शब्दांत उद्धव ठाकरे गटांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत घणाघात केला.
विधिमंडळ अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तुफान फटकेबाजी करीत विरोधकांच्या आरोपातील हवाच काढली. कोविड काळात रस्ते तयार करणाऱ्या कंपनीला सर्व नियम धाब्यावर बसवून ऑक्सिजन तयार करण्याचे काम दिले. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले, असल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला.
या दरम्यान, सुजित पाटकर (Sujit Patkar) यांनी त्यांच्या लाइफ लाइन हॉस्पिटलच्या माध्यमातून खूप काही लुटले. याठिकाणी रुग्ण काल्पनिक होते. तर काल्पनिक डॉक्टर होते. लाइफ लाइन हॉस्पिटलच्या माध्यमातून लुटत यातून कोणाचे घरे भरली आहेत, याची सर्वांना कल्पना आहे. घरात बसून यामधून मुख्यमंत्री हे एक नंबर झाले, खालून होते की वरून ते सगळयांना माहित आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खिचडीमध्ये मोठा घोटाळा
या पूर्वीच्या सरकारने खिचडीमध्ये मोठा घोटाळा केला. कोविड काळात रुग्णांना ३०० ग्रॅम ऐवजी १०० ग्रॅम खिचडी दिली. यामधील भ्रष्टाचाराची रक्कम चेकद्वारे रक्कम कुणाकडे गेली याचे पुरावे आहेत. त्यामुळे यामधून कॊनाचीही सुटका होणार नाही. सह्याद्री रिफ्रेशमेन्टच्या नावाने हा सर्व गैरव्यवहार झाला आहे, त्याचे पुरावे असल्याचे सांगत विरोधकांना मुख्यमंत्री शिंदेनी अडचणीत आणले.
(Edited by Sachin Waghmare)