Mantralay News
Mantralay News Sarkarnama
मुंबई

Mantralay News : सत्तांतरानंतर मंत्रालयातील गर्दीत मोठी वाढ ; व्यवस्थेवर ताण, प्रशासन 'हा' मोठा निर्णय घेणार..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यपध्दतीवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच ते घरात बसून सरकार चालवत असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला होता.

तर दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यासह मंत्रालयातही सर्वसामान्यांच्या गर्दीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच हा चर्चेचा विषयही राहिला आहे. मात्र, या वाढलेल्या गर्दीचा त्रास येथील कर्मचारी आणि पोलीस यंत्रणांना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

मुख्यमंत्री कार्यालयात होणाऱ्या गर्दीमुळे अधिकाऱ्यांना काम करणेही शक्य होत नव्हते. मंत्रिमंडळ बैठकीदिवशी तर मुख्यमंत्र्यांना भेटायला येणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे अनेकदा मंत्री आणि सचिवांनाही मुख्यमंत्र्यांना भेटायला त्यांच्या दालनात जाणे अवघड झाले होते. त्यामुळे सहाव्या मजल्यावरील गर्दीवरही नियंत्रण आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यासाठी असलेले चारही दरवाजे दुपारी दोन वाजेपर्यंत आतून बंद करण्यात आले आहेत. दोननंतरच अभ्यगतांना मुख्यमंत्री(Chief Minister) कार्यालयात रांग लावून प्रवेश दिला जात आहे.

शिंदे फडणवीस सरकार(Shinde Fadnavis Government) सत्तेत आल्यानंतर मंत्रालयातील गर्दी प्रचंड वाढली आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी तर मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर पाय ठेवायला जागा नसते, एवढी गर्दी असते. त्यामुळेच या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मंत्रालयातील आणि मुख्यमंत्री दालनातील प्रवेशावर काही निर्बंध आणण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आमदारांबरोबर गाडीत येणाऱ्या लोकांच्या संख्येवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

मंत्रालयात आमदारांबरोबर केवळ त्यांच्या पीएलाच गाडीतून मंत्रालयात प्रवेश देण्याबाबतही विचार सुरू आहे. आता प्रशासनाकडून मंत्रालयात प्रवेशासाठी संगणकीय टोकनपद्धती वापरण्यात येणार आहे. मंत्रालय प्रवेशासाठी घरबसल्या टोकन बुक करण्याची सुविधा देण्याबरोबरच दिवसाला ठराविक टोकन देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

गर्दीवर नियंत्रण आणण्याची प्रशासनाची मागणी

सध्या मंत्रालयातील प्रवेश आणि बाहेर पडण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. आता आलेला अभ्यागत संध्याकाळी उशिरापर्यंत फिरत असतो. सध्या प्रचंड गरम होत आहे. मंत्रालयात एसी असल्याने अभ्यागत काम झाल्यावरही एसीची थंड हवा घेत बसतात. कँटीनमध्ये चहा, नाश्ता, जेवण घेतात. त्यामुळे मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना कँटीन सुविधा अपुरी पडते. त्याशिवाय पाणी, वीजेचा वापरही वाढतो. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्याची प्रशासनाची मागणी आहे.

व्यवस्थेवर प्रचंड ताण

या सर्व उपायानंतरही गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही. पाच हजार कर्मचाऱ्यांच्या क्षमेतेच्या पायाभूत सुविधांवर गर्दीमुळे दुप्पट भार पडत आहे. वीज, पाणी, लिफ्ट, कँटीन सुविधा व सुरक्षा व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे बँकेत ज्या प्रमाणे टोकन दिले जाते. त्याप्रमाणे अभ्यागतांना टोकन वितरित करून मंत्रालयात प्रवेश देण्याची शिफारस सामान्य प्रशासन विभागाने गृह विभागाला केली आहे.

पास महत्वाचा...

ही गर्दी कमी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने गृह विभागाला दोन ते तीन पत्र पाठवून वेगवेगळे पर्याय सुचवले आहेत. त्यामुळे मंत्रालयात प्रवेशासाठी आँनलाईन बुकिंग, टोकन सिस्टिम आणि दुपारी तीन ते पाच यावेळेतच प्रवेशाच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. मंत्रालयात प्रवेश करताना टोकन द्यायचे आणि अभ्यागताचा पास द्यायचा. प्रवेश देण्यापूर्वी अभ्यागताचे ओळखपत्र घ्यायचे आणि बाहेर पडताना पास परत करता ओळखपत्र परत द्यायचे. त्यामुळे आत गेलेली व्यक्ती बाहेर पडली, हे लक्षात येईल. आतमध्ये एकावेळेस ठराविक संख्येत अभ्यागतांना द्यावा असा प्रस्तावही देण्यात आला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT