<div class="paragraphs"><p>Uddhav Thackeray-aadityaThackeray</p></div>

Uddhav Thackeray-aadityaThackeray

 

sarkarnama

मुंबई

आदित्यने माझा ताण हलका केला : उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वतः जाऊन रस्त्याची कामे पाहायचे. ते पाहत पाहत मीही नालेसफाई आणि रस्त्याच्या कामाची थेट जाऊन पाहणी करायचो. अनेकदा नाल्यात उतरूनही तपासणी करत संबंधितांना सूचना केल्या आहेत. आता आदित्यने (Aaditya Thackeray) माझा ताण थोडासा म्हणजे संपूर्णपणे कमी केला आहे. तो रात्री-अपरात्री लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांशी संवाद साधत कामे पाहत होता, अशा शब्दांत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कामाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कौतुक केले. (Aditya eases my stress : Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर प्रथमच शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील गोष्ट नमूद केली. या वेळी त्यांनी मुंबईकरांसाठी मोठी घोषणाही केली. मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. तसेच, या निणर्याची तत्काळ अंमलबजावणी करा, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली. त्याचा १६ लाख कुटुंबांना फायदा होणार आहे.

ते म्हणाले की, मुंबई देशाचे हे आर्थिक केंद्र आहे. सन १९६६ पासून जन्माला आलेली शिवसेना नागरिकांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळतेय. आमची ही चौथी पिढी आहे. आजोबा, वडील, मी आणि आता आदित्य काम करत आहोत. काम म्हणून नाही, कर्तव्य म्हणून नाही तर मुंबईवरचं प्रेम आम्ही पुढे नेत आहोत. शिवसेनाप्रमुख स्वत: जाऊन कामाची पहाणी करत. मी ही नालेसफाई, दहिसर नदीचे काम असेल   किंवा सौंदर्यीकरणाचे काम असेल ते जाऊन पहात होतो, आता हे काम आदित्य करत आहे.

सुविधा द्यायच्या आहेत. नालेसफाई, सौंदर्यीकरण असेल, नदीसफाई असेल, पण हे करताना मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे. मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देतो. पण त्याला परत काय मिळतं, हा खरा प्रश्न आहे. मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत. शिवसेना हे असे अजिबात करत नाहीत, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, आता शिवसेनेसोबत आणखी काही मित्र आले आहेत. मग राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल. शिवसेनाप्रमुखांनी आखून दिलेली परंपरा शिवसेना जपते. जे काम जमणार असेल तेच वचन द्यायचे, जे जमणार नाही अशी खोटे वचने द्यायची नाहीत, त्यांची हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत. २०१७ ला जे निवडणुकीत शिवसेनेने जे वचन दिले होते, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, यातील बहुतांश वचने पूर्ण केली. आज एक महत्वाचे वचन या निर्णयाने पूर्ण होत आहे. ५०० चौरस फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण आज पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्या वतीने धन्यवाद देतो

देशाचे आर्थिक केंद्र असणाऱ्या मुंबईकरांना हा दिलासा देण्याचा प्रयत्न. ज्यांनी कष्ट करून घाम गाळून मुंबईला उभी केली त्यांच्यासाठी हा निर्णय, त्यांच्यासाठीच्या वचनाला आपण आज जागलो आहोत. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करा, अशी सूचनाही मुख्यमंंत्र्यांनी केली. सामान्य माणसांचे जीवन सुसह्य करण्‍याचा हा प्रयत्न आहे. मला जाणीव आहे की केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेला देणे हे आपले कर्तव्यच. मुंबईकरांना वचन देतो की,   तुमच्या सगळ्या   गोष्टींची पूर्तता करण्यास, दिलेली वचन पूर्ण करण्यास मी वचनबद्ध आहे, फक्त तुमचे आशीर्वाद आमच्यावर असू द्या, असे आवाहनही त्यांनी मुंबईकरांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT