Eknath Shinde| Devendra Fadnavis
Eknath Shinde| Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News: भाजपच्या हालचालींनंतर आता शिंदेही अलर्ट, सर्व खासदारांची बोलावली तातडीची बैठक....

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात भाजपनं 'मिशन ४८'च्या दृष्टीनं पावलं टाकली आहे.काही दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांसह नड्डांनीही आगामी निवडणुका जिंकण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेंही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी उद्या (दि.२३) वर्षा या निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार आहे. त्यामुळे बैठकीत काय मोठी रणनीती ठरवली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी, 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन व्यूहरचना आखली जाणार असल्याचं समोर आलं आहे. मतदारसंघातील प्रलंबित कामांचा आढावा देखील घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, लोकसभा(Loksabha Election) आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून खासदारांना जबाबदाऱ्या देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तसेच या खासदारांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या सभा घेण्यावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, बैठकीचा तपशील कुणालाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे बैठकीत नेमकी कशावर चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. यावर टीका करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, '२०१८ मध्येही राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड निवडणुकांनंतर विरोधी पक्षाकडून भाजप संपल्याचं सांगितलं जात होतं. मात्र सहाच महिन्यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण या तीनही राज्यांमधील लोकसभेच्या सगळ्या जागा जिंकल्या. यावेळीही तसंच होणार आहे असं फडणवीस म्हणाले

महाराष्ट्रात आपण तेवढ्याच जागा जिंकू...फडणवीसांचं मोठं विधान

महाराष्ट्रात भाजपने २०१४ साली ४२ जागा जिंकल्या, २०१९ सालीही तेवढ्याच जागा जिंकल्या आणि आता २०२४ मधील निवडणुकीतही आपण तेवढ्याच जागा जिंकू, एखादी जास्त जिंकू, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना आश्वस्त केलं होतं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT