Gopichand Padalkar - Sharad Pawar- sharad Pawar  Sarkarnama
मुंबई

Shivsena On Sharad Pawar: पडळकरांनंतर शिंदे गटाची पवारांवर खोचक टीका ; '' महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्यावर पूर्णपणे भरवसा...''

Deepak Kulkarni

Mumbai : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली होती. या टीकेवरुन संपूर्ण राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेताना पडळकरांसह भाजपला कडक इशाराही दिला होता. या टीकेचा धुराळा बसत नाहीतोच आता शिंदे गटाच्या नेत्याने शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांवर पूर्णपणे भरवसा ठेवणारी एकही व्यक्ती नाही अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी रविवारी संवाद साधला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खोचक टिप्पणी केली आहे. शिरसाट म्हणाले, शरद पवार कधीही कुणाबरोबरही युती करू शकतात. त्यांची कुणीही खात्री देऊ शकत नाही. त्यांच्या राजकारणावर कुणीही विश्वास ठेवत नाहीत, असा शिरसाट यांनी शरद पवारांना निशाणा साधला आहे.

संजय शिरसाट म्हणाले, शरद पवार(Sharad Pawar) हे कुणाबरोबर युती करतील आणि कधी कोणत्या पक्षात जातील, याबद्दल कुणीही खात्री देऊ शकत नाही. आज ते इंडिया आघाडीत आहेत, पण उद्या ते दुसरीकडे दिसतील आणि परवा ते एकला चलो रेच्या भूमिकेत दिसतील. परिणामी, शरद पवारांच्या राजकारणावर किंवा त्यांच्या विधानावर कुणीही विश्वास ठेवत नाही, हे सत्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांवर पूर्णपणे भरवसा ठेवणारी एकही व्यक्ती नाही अशी टीका शिरसाटांनी केली आहे. या टीकेनंतर आता सत्तेत सहभागी झालेला अजित पवार गट काय भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच शरद पवार गट देखील शिरसाटांच्या टीकेनंतर आक्रमक होण्याची शक्यता आहे.

'' प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असते...''

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी या नव्या वादाला सुरुवात केली आहे. २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील असा दावा लाड यांनी केला आहे. यावर शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असते, त्यात काही वावगे नाही. प्रसाद लाड हे भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांना फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे वाटणे साहजिक आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते, त्यात काही गैर नाही. जसं त्या पक्षांना वाटते की, त्यांचा नेता मुख्यमंत्री होईल, तसेच आम्हालादेखील वाटते की, २०२४ मध्ये एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील.

'' २०२४ मध्ये दुसरा कोणी मुख्यमंत्री होईल असं वाटत नाही...''

शिंदेसाहेब ज्या पद्धतीने राज्यात काम करत आहेत, ते पाहता मला नाही वाटत २०२४ मध्ये दुसरा कोणी मुख्यमंत्री होईल, असा चिमटाही शिरसाट यांनी काढला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे खुद्द फडणवीस जाहीरपणे सांगत असतात. मात्र, त्यांच्या पक्षाचे आमदार वेगळीच भूमिका मांडत असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण? याची चर्चा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमध्ये आतापासूनच सुरू झाली आहे. भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांनी २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील, असा दावा केला आहे. यावर आता शिंदे गटाकडूनही प्रतिक्रिया आली आहे. भाजपला जसे वाटते की, पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तसे आम्हालाही वाटते की. पुढचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच असतील, असा पलटवार शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांनी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT