Amit Shaha, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : 'मुख्यमंत्रि'पदावरून अजितदादांची गृहमंत्री शहांकडे नवी 'डिमांड'; भाजप अन् शिवसेना काय करणार?

Akshay Sabale

विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीत रणकंदन सुरू आहे. त्यापूर्वीच 'मुख्यमंत्रि'पदावरून दोन्ही आघाड्यांत रस्सीखेच असल्याचं दिसते. एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असं शिंदे गटातील आमदार ठासून सांगत असतात. भाजपचे नेते आणि आमदार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, असं 'कॉन्फिडन्स'मध्ये बोलतात. आता मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गृहमंत्री अमित शहांकडे मुख्यमंत्रिपदावरून मोठी मागणी केल्याचं समोर आलं आहे.

'लाडकी बहीण योजने'चं श्रेयवाद, कट्टर हिंदुत्त्व आणि जागावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेकडून ( शिंदे गट ) राष्ट्रवादी काँग्रेसची ( अजितदादा पवार ) कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जाते. त्यातच अजितदादांच्या राष्ट्रवादीनं अचानक आक्रमक पवित्रा घेतला आहे. महायुतीतील तीनही घटक पक्षांना आलटून-पालटून मुख्यमंत्रिपद दिले पाहिजे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांनी गृहमंत्री शहांकडे केल्याचं समजते. परंतु, खासदार प्रफुल पटेल यांचं खंडण केलं आहे. याबाबत एका वृत्तपत्रानं वृत्त दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीत ज्या विदर्भ आणि मराठवाड्यात महायुती प्रामुख्यानं भाजपला ( Bjp ) धक्क्यांवर धक्के बसले तिथून गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी विधानसभेच रणशिंग फुंकलं आहे. शहांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र देत निवडणुकीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे शहांनी घेतलेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह भाजप, शिवसेना ( शिंदे गट ), राष्ट्रवादीचे ( अजितदादा पवार ) अन्य नेते उपस्थित होते.

महायुतीच्या बैठकीनंतर अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यावर मुख्यमंत्रिपद फिरते ठेवावे, अर्थात तीनही घटक पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळाले पाहिजे, असे मत अजितदादांनी गृहमंत्री शहा यांच्याकडे मांडल्याचं बोललं जाते.

तीनही पक्ष एकत्रितपणे सामोरे जाणार....

प्रफुल पटेल यांनी हा मुद्दा धुडकावून लावला आहे. "गृहमंत्री शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही चर्चा झाली नाही. आलटून-पालटून मुख्यमंत्रिपदाचा मुद्दाही उपस्थित झाला नाही. महायुतीतील तीनही पक्ष एकत्रिपतपणे निवडणुकीला सामोरे जातील. एकमेकांमधील समन्वय वाढवण्यावर चर्चेत अधिक भर देण्यात आला," असं पटेल यांनी स्पष्ट केलं.

भाजप अन् शिवसेना काय करणार?

दरम्यान, अजितदादांनी मुख्यमंत्रिपद फिरते ठेवावे, अशी 'डिमांड' शहांकडे केली आहे. दुसरीकडे पटेल हे कितीही फेटाळून लावत असले, तरी अजितदादांची मुख्यमंत्रिपदाची मनीषा लपून राहिली नाही. त्यामुळे अजितदादांच्या 'डिमांड'वर भाजप आणि शिवसेना ( शिंदे गट ) कोणती प्रतिक्रिया व्यक्त करतात? आणि काय निर्णय घेतात? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT