Sachin Sawant, Ajit Pawar
Sachin Sawant, Ajit Pawar sarkarnama
मुंबई

'अजित पवारांना पंतप्रधानांच्या सभेत बोलू न देणे हे जाणिवपूर्वक घडले आहे!'

Amol Jaybhaye

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या देहूतील कार्यक्रमावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात मोदींशेजारी बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाषण केले नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यावरुन आता काँग्रेसनेही (Congress) आक्रमक भूमिका घेत भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.

या संदर्भात काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले, ''उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधानांच्या सभेत बोलू न देणे हे जाणिवपूर्वक घडले आहे, असे दिसते. गतवेळेस दादांनी पंतप्रधानांसमोर राज्यातील महत्वाच्या व्यक्तीची शिवराय व महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातील वक्तव्ये निदर्शनास आणली होती. त्याचाच राग निघालेला दिसत आहे'' अशा शब्दांत सावंत यांनी टिका केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाकडूनच अजितदादांच्या भाषणाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे म्हटले आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे भाषण करण्याचा त्यांचा अधिकार आहे. कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलू दिले पण अजित पवार यांना नाही. अजित पवारांच्या कार्यालयातून याबाबत पंतप्रधान कार्यलयाकडे भाषणाबाबत कळवले होते. पण पीएमओमधून भाषणाला परवानगी देण्यात आली नाही, असे सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधिंना निमंत्रण नसल्यामुळे त्यावरुन आर्श्चय व्यक्त होत आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) आणि मावळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार सुनील शेळके (Sunil Shelake) यांना निमंत्रण नव्हते. या दोघांच्या मतदारसंघात हा कार्यक्रमात होता. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

याविषयी 'सरकारनामा'शी बोलताना बारणे म्हणाले, ``मी संत तुकाराम महाराजांचा भक्त आहे. पदावर नसल्यापासून मी वारीत सहभागी होत आहे. या कार्यक्रमाला मला जायला आवडले असते. हा देहू संस्थानचा कार्यक्रम होता. पण भाजपने तो कार्यक्रम आयोजित केला आहे, असे चित्र निर्माण झाले. यामध्ये पक्षीय राजकारण करणे योग्य नव्हते. या कार्यक्रमापासून स्थानिक प्रतिनिधींना दूर ठेवणे योग्य नव्हते. मी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा असूनही निमंत्रण नसल्याने मला जाता आले नाही. माझी कोणावरही नाराजी नाही, पण भाजपने (BJP) हा कार्यक्रम हायजॅक केला.`` उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तरी भाषणासाठी कोठे संधी दिली, असाही सवाल बारणे यांनी केला.

आमदार सुनील शेळके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचे मत कळू शकले नाही. स्थानिक आमदार आणि खासदार यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नव्हते की नाही, याबाबत देहू संस्थानशी भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यांची बाजू समजताच त्यांचे स्पष्टीकरण देण्यात येईल. पण कार्यक्रमाच्या ठिकाणी भाजपच्या नेत्यांची गर्दी लक्षात येण्यासारखी होती. देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे यांनी भाजपचे माजी राज्यमंत्री आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांना या कार्यक्रमाच्या नियोजनाचे श्रेय आपल्या प्रास्ताविकात दिले. त्यावरूनही अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT