Amol Kolhe  Sarkarnama
मुंबई

Amol Kolhe News : ट्रिपल इंजिन... ट्रिपल वसुली... अमोल कोल्हेंनी वाहतूक पोलिसांच्या वसुलीचे टार्गेट आणले चव्हाट्यावर

Sachin Fulpagare

Maharashtra Politics Latest News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्यातील महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. राज्यात वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून वसुली सुरू आहे. ट्रिपल इंजिन... ट्रिपल वसुली? असा प्रश्न उपस्थित करत खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यातील महायुती सरकार निशाणा साधला आहे.

मुंबईत वाहतूक पोलिसांनी दंड बजावल्यानंतर खासदार कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अमोल कोल्हे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली आहे. मुंबईतून बाहेर पडत असताना धक्कादायक अनुभव आला, असे अमोल कोल्हे म्हणाले.

एका सिग्नलला मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांनी आपली कार आडवली आणि जो काही ऑनलाइन दंड आहे, तो तत्काळ भरावा, अशी मागणी ड्रायव्हरकडे केली. हा एकूण काय प्रकार आहे, याची मी चौकशी केली. त्या महिला पोलिस भगिनीने ओळखले आणि थेट त्यांनी मला मोबाईलवरील मेसेज दाखवला. हा मेसेज खूप धक्कादायक होता, असे ते पुढे म्हणाले.

प्रत्येक चौकात 25 हजार रुपयांची दंडवसुली ही व्हायलाच हवी. आणि 20 वाहनांवर कारवाई व्हायलाच हवी. एकूण चौकांची संख्या गुणिले 25 हजार, असे केल्यास येणारा एकूण आकडा पाहिला तर खूपच धक्कादायक वास्तव समोर येते. यामुळे संबंधित मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी यावर प्रकाश टाकावा. वाहतूक शाखेच्या पोलिस बांधवांचे कर्तव्य हे वाहतूक नियमनाचे आहे. पण त्यापलीकडे जाऊन जर हे आताचे ट्रिपल इंजिन सरकार अशा प्रकारे वसुलीसाठी वापर करत असेल, तर आमच्या ज्ञानात याने भर पडेल. हा अत्यंत धक्कादायक अनुभव आहे. अशा पद्धतीने टार्गेट देऊन वसुली केली जात असेल, तर या ट्रिपल इंजिन सरकारची ट्रिपल वसुली सुरू आहे असे खेदाने म्हणावे लागेल, असे सांगत कोल्हेंनी हल्लाबोल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टवर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओसह अमोल कोल्हे यांनी मुंबईसह राज्यातील वाहतूक पोलिसांच्या वसुलीचा हिशेब मांडला आहे.

"आजचा धक्कादायक अनुभव-

मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाइन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे, याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला- प्रत्येक चौकात २५००० रुपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे!

मुंबईत 652 ट्रॅफिक जंक्शन आहेत. 25,000×652 = 1,63,00,000/ प्रतिदिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल 1.63 कोटी रुपये... इतर शहरांचं काय?

संबंधित मंत्री महोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का, याची जनतेला माहिती मिळेल! ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली???", असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT