Nana Patole On Phone Tapping :  Sarkarnama
मुंबई

Nana Patole On Phone Tapping : फडणवीस गृहमंत्री होताच फोन टॅपिंगप्रकरणी शुक्लांना क्लिनचीट मिळतेच कशी ? पटोलेंचा सवाल !

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : भाजपला धक्का देत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन केली होती. याच आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण राज्यात प्रचंड गाजले होते. याच प्रकरणावरून आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर सरकारवर जोरदार टीका केली आहे. (Latest Marathi News)

फोन टॅपिंग प्रकरणात आरोपी न सापडल्याने सीबीआयकडून क्लोझर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. गुन्हा खरा आहे, गोपनीय कागदपत्रे लीक झाली आहेत, मात्र या प्रकरणात आरोपींचा शोध लागत नाही, आरोपी सापडत नाहीत असा सीबीआयचा दावा होता. तो कोर्टाकडून मान्य करण्यात आला आहे. दरम्यान गोपनीय कागदपत्रे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे कशी आणि कधी गेली, हे समजून येत नाही, असंही सीबीआयने कोर्टाला सांगितलं आहे. यावरून नाना पटोले आक्रमक होत यावर काही सवाल उपस्थित केले आहेत.

नाना पटोले म्हणाले, ज्या वेळेस रश्मी शुक्लांवर या प्रकरणी चौकशी सुरू झाली, त्यामध्ये पुणे पोलिसांनी, शुक्लांनी हे फोन टॅपिंग जाणीवपूर्वक केली, या आधारावर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. हे प्रकरण पुण्याच्या कोर्टात चाललं. जसं फडणवीसांचं सरकार आलं, ते गृहमंत्री झाले, त्याचवेळी शुक्लांना क्लिनचीट देण्याचा प्रयत्न झाला. मात्र सत्र न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयला देण्यात आलं. सीबीआयकडे दिलं म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये धुवून निघतं का? शुक्लांनी जे काही पाप केलेलं आहे, ते लपलेलं नाही. आज क्लिनचीट दिली तरी भविष्यात आम्ही फाईल उघड करू, असा इशारा पटोलेंनी दिला.

दरम्यान सीबीआयच्या भूमिकेवर आता राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सीबीआयवरच अविश्वास व्यक्त केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, "आरोपी आम्हाला सापडत नाहीत असं सीबीआयचं जर म्हणणं असेल, तर हा आरोपींना पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे. आरोपींना वाचवण्यासाठी सीबीआय असे प्रकार करणार असेल तर आता जनतेलाही सीबीआयवर विश्वास राहिला नाही. या देशातील तपास यंत्रणा कुचकामी झाली. सत्ताधारी, पंतप्रधान, सरकारच्या इशाऱ्यावर चालणारी ही सीबीआय ही संस्था आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे."

काय आहे प्रकरण ?

याबाबत सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारल्याने ‘फोन टॅपिंग’प्रकरण कायमचे बंद झाले आहे. या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे. रश्मी शुक्ला राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त होत्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळ्याचा आरोप करत सभागृहात अहवाल वाचून दाखवला होता. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याकडूनच माहिती लीक झाल्याचे समोर आले होते. त्यांनंतर त्यांनी आपण महाराष्ट्र सरकारच्या परवानगीनेच फोन कॉल्स टॅप केल्याचे सांगत आपली बाजू मांडली होती.

महाविकास आघाडी सरकारमधील नाना पटोले, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅपिंग केल्याच्या आरोप रश्‍मी शुक्ला यांच्यावर आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ठपका ठेवल्यानंतरच्या उच्चस्तरीय समितीच्या अहवालानुसार शुक्‍ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सरकारने फेब्रुवारी 2021 मध्ये दिल्यानंतर शुक्‍ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT