Ashish Shelar on Aditya Thackeray  Sarkarnama
मुंबई

Ashish Shelar : आशिष शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाले, तुमच्यामुळे मुंबई तहानलेली

BJP Ashish Shelar on Aaditya Thackeray : मुंबईच्या या परिस्थितीला संपूर्ण जबाबदार आदित्य ठाकरे आणि त्यांचा उबाठा सेना हा पक्ष आहे', असा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे.

Rashmi Mane

मुंबईची तहान भागवण्यासाठी 'गेल्या दहा वर्षात मुंबई महापालिकेने एकही नवीन धरण बांधले नाही, नवीन पाण्याची व्यवस्था केली नाही, उलट गारगाई धरण प्रकल्प रद्द केला आणि समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव जबरदस्तीने मुंबईकरांच्या माथी मारला. तोही पूर्ण होऊ शकला नाही. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमुळे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुंबईला पाणीपुरवठा करणारा प्रकल्प पुढे जाऊ शकला नाही. मुंबई तहानलेलीच राहिली. त्यामुळे आज मुंबईची ही अवस्था झाली आहे. या परिस्थितीला संपूर्ण जबाबदार आदित्य ठाकरे आणि त्यांचा यूबीटी सेना हा पक्ष आहे', असा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे मंत्री असताना आणि त्यांचे सरकार महानगरपालिकेमध्ये असताना त्यांनी केलेलं पाप मुंबईकरांना भोगायला लागत आहे. मुंबईकरांच्या डोळ्यातून अश्रू निघत आहेत. असा घणाघात शेलारांनी केला आहे. 'उत्तम पाऊस झाल्यानंतर सुद्धा मुंबईतल्या काही भागांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा योग्य दाबाने होत नाही याला जबाबदार 25 वर्षे पालिकेत सत्ताधारी असणारे आदित्य ठाकरे आहेत. कंत्राटदार प्रेमी आदित्य ठाकरे यांनी गारगाई धरणाचा प्रकल्प रद्द केला आणि समुद्राचे पाणी गोडे करण्याचा महागडा प्रकल्प मुंबईकरांच्या माथी मारला. त्याचेही पुढे काही झाले नाही. म्हणून मुंबईची आज ही अवस्था आहे. अशी टीका आशिष शेलारांनी केली आहे.

90 च्या दशकात डॉ माधवराव चितळे यांच्या समितीने सांगितल्या प्रमाणे गारगाई, पिंजाळ या धरण बांधण्याची कामे झाली नाही. उलट ते आदित्य ठाकरे यांनी प्रस्ताव रद्द केले. मुंबईत ठिकठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आहे, अनेक ठिकाणी पाणीच येत नाही, त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या अनेक तक्रारी सातत्याने लोकप्रतिनिधी म्हणून अमच्याकडे केल्या जात आहेत. त्यामुळे वास्तविकता समोर आली असेही शेलार म्हणाले.

गारगाई या धरणाच्या परवानग्या आणि नियोजन सुरू झाले होते. मात्र तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांचे सरकार राज्यात आणि महापालिकेत असताना हा प्रकल्प रद्द केला. कंत्राटदारांच्या प्रेमातून अत्यंत महागडा असलेला समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पुढे रेटला. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत ४४०० कोटी रुपये होती आता हा प्रकल्प ८ हजार कोटींवर गेला तरी सुद्धा अद्याप त्याची निविदा निघालेली नाही. त्याला प्रतिसाद मिळत नाही. या सगळ्याचा परिणाम मुंबईच्या (Mumbai) पाणी पुरवठ्यावर झाला आहे.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि त्यांच्या पक्षाने हा केलेला खेळ खंडोबा याचे दुष्परिणाम आज मुंबईकरांना भोगावे लागत आहेत. पिण्याच्या पाण्यावरून मुंबईकरांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. आज हे जे मुंबईत दुर्दैवी चित्र उभे राहिले आहे त्याला संपूर्ण जबाबदार आदित्य ठाकरे आहेत. मुंबई ३४% पाणी गळती आहे असे महापालिका सांगते आहे. त्यासाठी कोट्यावधीची कंत्राटे दिली, पण त्याचे पुढे झाले काय 0 हे कळायला मार्ग नाही, असे गंभीर आरोप आमदार अशी शेलार यांनी आज येथे केले. समुद्राचे पाणी गोडे करणे याबाबत जागतिक पातळीवर अभ्यासांती सिद्ध झाले आहे की ते पर्यावरण घातक आहे, शिवाय खर्चिक आहे ही बाब आम्ही त्याही वेळा लक्षात आणून दिली होती. मात्र थातूरमातूर कारण देऊन हा प्रकल्प पुढे रेटला व गारगाई प्रकल्प रद्द केला. गारगाई प्रकल्पामध्ये बाधित होणारी झाडांचे पुनर्वसन व नवी वनराई निर्माण करण्यासाठी जागाही निश्चित झाली होती. पण आदित्य ठाकरे यांनी हा प्रकल्प रद्द केला व आपल्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पुढे रेटला त्याचे परिणाम आज मुंबईकर भोगत आहेत, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT