Advocate Ujjwal Nikam Sarkarnama
मुंबई

Badlapur Case : ज्या पक्षाची शाळा, त्याच पक्षाच्या उज्ज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती, प्रकरण दाबलं गेलं तर? काँग्रेसचा सवाल

Jagdish Patil

Badlapur School Crime Case Update : बदलापुरातील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा खटला चालविण्यासाठी राज्य शासनाकडून ज्येष्ठ वकील उज्वल निकम ( Ujjwal Nikam) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र निकम यांच्या नियुक्तीवर आता विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.

बदलापूर प्रकरणात ज्या पक्षाशी संबंधित शिक्षण संस्था आहे, त्याच पक्षाशी संबंधित व्यक्तीची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या वकिलांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे. उद्या हे प्रकरण दाबलं गेलं तर त्यासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी बदलापूर अत्यचार प्रकरणावरुन महायुती सरकारवर हल्लाबोल केला. सावित्रीबाई फुले यांच्या राज्यामध्ये 11 तास मुलींना बसवून ठेवलं होतं. त्या मुलीची गर्भवती आई बाकड्यावर झोपली होती. त्यावेळी राज्यकर्ते म्हणून तुम्हाला लाज वाटली नाही का? घटनेचा निषेध करून कारवाई करण्याऐवजी तुम्ही विरोधकावर खापर फोडत आहात. मागच्या सात महिन्यांत ठाण्यात 57 टक्क्यांनी गुन्ह्यांमध्ये वाढ झाली, याचे उत्तर द्यायला नको. महिलांवर लाठीचार्ज करताना लाज वाटत नाही का?, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.

तसंच ही घटना 13 तारखेची असून 16 तारखेला रिपोर्ट होतो. तुम्ही कारवाई करत नाही शिवाय संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहात असा आरोपही त्यांनी सरकारवर केला. शिवाय या प्रकरणात गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये (Badlapur) ही घटना झाली, त्यांनीही राजीनामा द्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

पोलीस यंत्रणा कुठे आहे? सरकार आहे कुठे? त्या शाळेमध्ये इतर सुद्धा तक्रारी येऊ शकतात. जनता रस्त्यावर येते आणि तुम्ही लोकांकडे बोट दाखवता. मुलींवर अत्याचार झाला म्हणून वातावरण पेटलं आहे. त्या नराधमाला भरचौकात फाशी द्या. संबंधित संस्थाचालकावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, असं म्हणत यावेळी त्यांनी या प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या वकिलांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला.

प्रकरण दाबलं गेलं तर?

ते म्हणाले, "या प्रकरणी नियुक्त केलेला वकील सुद्धा त्यांच्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेला आहे. मग या प्रकरणात काय न्यायाची अपेक्षा करणार? या प्रकरणात ज्या पक्षाशी संबंधित शिक्षण संस्था आहे, त्याच पक्षाशी संबंधित व्यक्तीची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या वकिलांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे. उद्या हे प्रकरण दाबलं गेलं तर त्यासाठी जबाबदार कोण?, यापेक्षा मोठा वकील मिळत नाही का तुम्हाला. त्या मुलींचं आयुष्य उध्वस्त करणाऱ्या नराधमाला आणि त्याला साथ देणाऱ्यांचा तुम्ही काय बंदोबस्त करणार आहात?" असे अनेक प्रश्न वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT