Uddhav Thackeray-Bala nandgaonkar-Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Bala Nandgaonkar: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा अन् मनसेच्या नांदगावकरांचं मोठं विधान; म्हणाले,'शिंदे ग्रेटच, उद्धव यांनी...'

MNS - ShivsenaUBT : मनसे नेते बाळा नांदगावकरांनी आपल्या मुलाखतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर 'ठाकरे बंधूंपासून सगळ्यांनी एकत्र येण्याचा विचार केला पाहिजे असं म्हटलं. मराठी संस्कृतीचं रक्षण करणाऱ्या या दोन्ही संघटना आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : राज्यात आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय समीकरणं पुढं येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच हिंदीसक्तीच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एवढंच नाही, तर ठाकरे बंधूंनी एकत्र पत्रिका काढली असून येत्या 5 जुलै रोजी ते विजयी मेळावाही घेणार आहेत. याचदरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी एकनाथ शिंदेंविषयी मोठं विधान करत खळबळ उडवून दिली आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर हे साम वृत्तवाहिनीवरील 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' या कार्यक्रमात बोलत होते.ते म्हणाले,एकनाथ शिंदे काय वाईट माणूस नाही,ही पहिली गोष्ट सांगतो.कारण अत्यंत काम करणारा , माणूस,प्रामाणिकपणे पक्षासोबत होता.पक्षासाठी वाट्टेल ते करणारा माणूस.दुर्दैवानं त्यांच्यात काय बिनसलं माहिती नाही.पण उद्धवसाहेबांनी एकनाथ शिंदेंना सांभाळायला हवं होतं, असं माझं आजही मत आहे.पण दुर्देवानं ते झालं नसल्याचं नांदगावकर म्हणाले.

मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्यावेळेस निघून गेले,त्यावेळेस फार मनापासून दु:खं झालं.त्यावेळी मुंबईत नव्हतो. नागपूरला कुठल्यातरी जंगलात होतो,तेव्हा मला हे कळलं. कारण 21 तारखेला माझा वाढदिवस असतो. पण त्याआधीच 20 तारखेला शिवसेनेतील आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले. मात्र,हे ऐकून मला खूप दु:खं झालं.माझ्या डोळ्यात अश्रू आल्याचंही नांदगावकरांनी सांगितलं.

ठीक आहे, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो होतो. पण त्यानंतरही तो पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात एकसंध होता. पण हे झाल्यावर त्याच रात्री आपण राज ठाकरेंना फोन करुन आपल्याही भावना बोलून दाखवल्या आहेत. त्याचमुळे मला फार वाईट वाटल्याचंही ते यावेळी म्हणाले.

बाळासाहेबांची एक संघ एक विचार असलेली शिवसेना जेव्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना,राज ठाकरेंची मनसे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी त्रिभाजित होते, त्यावर नांदगावकर म्हणाले,मी काही भावना शब्दांत व्यक्त करु शकत नाही. पण मनाला निश्चितच मनस्वी दु:खं होतं.त्याचंकारण एवढंच आहे की, 'हेचि फळ मम तपाला' असंच झालं ना, असंही मनसेच्या बाळा नांदगावकरांनी या मुलाखतीत म्हटलं.

यावेळी बाळा नांदगावकर यांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, 'हा जो मेळावा आहे, त्यात दोन वेगवेगळे पक्ष आहेत. ते एका विषायपुरता एकत्र आले आहेत. एकत्र येण्याचा निर्णय जरी आमचा सगळ्यांचा असला तरी दोघं एकत्र येणं याचा अधिकार त्या-त्या पक्षप्रमुखांचा आहे. मुळात मराठी माणूस आस लावून बसलाय की, दोन भाऊ एकत्र आले पाहिजे', असंही नांदगावकरांनी यावेळी म्हटलं.

मनसे नेते बाळा नांदगावकरांनी आपल्या मुलाखतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर 'ठाकरे बंधूंपासून सगळ्यांनी एकत्र येण्याचा विचार केला पाहिजे असं म्हटलं. मराठी संस्कृतीचं रक्षण करणाऱ्या या दोन्ही संघटना आहे. मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे, मराठी माणूस टिकला पाहिजे आणि मराठी माणूस भविष्यात एकत्र राहिला पाहिजे', अशी भूमिकाही नांदगावकर यांनी मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT