Shivsena
Shivsena Sarkarnama
मुंबई

Shiv Sena : 'भाजपने ढोंगाशी ‘निकाह’ लावून सरकार बनवलं, शिंदेंसमोर सत्तेची हाडके ; ठाकरेंचा हल्लाबोल

सरकारनामा ब्युरो

Balasaheb Thackeray Death Anniversary : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा (Bal Keshav Thackeray) आज (१७ नोव्हेंबर) दहावा स्मृतीदिन आहे. (balasaheb thackeray death anniversary latest news)

स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला काल (बुधवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. आज (गुरुवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी येऊन अभिवादन केले आहे. यावेळी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे उपस्थित होते.

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकचे बाण सोडलं आहेत. "महाराष्ट्र म्हणजे दिल्लीच्या पायरीवरचे एक पायपुसणेच झाले होते. त्या वेळी बाळासाहेबांच्या विचारांची वीज कडाडली व संपूर्ण महाराष्ट्र त्या विचाराने उजळून निघाला. तो प्रकाश, ते तेज आजही कायम आहे. बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न आजपर्यंत काय कमी झाले? मात्र त्या सगळ्यांना शिवसेना पुरून उरली. आता शिवसेनेचा सूर्य गिळण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण या सूर्याच्या प्रखर तेजाने दुश्मन जळून खाक होईल," असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

'भाजपने ढोंगाशी ‘निकाह’ लावून सरकार बनवले व त्या ढोंगालाच ते ‘शिवसेना’ मानत आहेत. आज बाळासाहेब असते तर या ढोंग्यांना शिवतीर्थावरच सोलून आणि फोडून काढले असते, असा घणाघात अग्रलेखात करण्यात आला आहे. 'शिवसेना या संघटनेचे सेनापती बाळासाहेब ठाकरे होते व आजही आहेत. त्या संघटनेच्या पाठीत भाजपने चाळीस खंजीर खुपसून देशद्रोहच केला. हा देशद्रोहासारखाच प्रकार आहे, अशी टीका ठाकरेंनी केली आहे.

शिवसेनेच्या विचारांची मशाल धडधडत ठेवा

बाळासाहेबांच्या जीवनात व आचरणात ढोंगाला अजिबात स्थान नव्हते. त्यांनी बेइमानीस कधीच थारा दिला नाही. बाळासाहेब हे महाराष्ट्रात जन्मलेले स्वाभिमानाचे हिमालय होते. ज्या महाराष्ट्राच्या मातीचे, ‘मराठी’ समाजाचे आपण घटक आहोत, तो महाराष्ट्र, मराठी समाज विस्कळीत झाला आहे. त्याला राजदरबारात पिंमत नाही. त्याला सार्वजनिक मत नाही. त्याला रोज अपमान आणि अवहेलनेस सामोरे जावे लागत आहे. ‘स्वाभिमान’ आणि ‘तेज’ या शब्दांशी त्याचा काही संबंध उरलेला नाही. त्याला रोज लाथाडले जात आहे, हे बाळासाहेबांनी पाहिले, मनावर घेतले. परिणामी मराठी माणूस व महाराष्ट्रावरील अन्यायाविरुद्ध लढायचे आणि त्यासाठी शिवसेनेच्या विचारांची मशाल धडधडत ठेवायची हेच आपले ध्येय असे त्यांनी ठरवून टाकले. शिवसेनेला लढत ठेवले व शेवटी लढता लढता एका महान योद्धय़ाप्रमाणे त्यांनी आपला देह ठेवला.

शिवसेना संपवून ‘बदला’ घेतला

बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने महाराष्ट्र आणि देश आजही भारावलेला आहे. मात्र, महाराष्ट्रात शिवसेनेचा फुटीर गट बेइमानी करूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जप करतोय, हे ढोंग आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवून ‘बदला’ घेतला म्हणून ज्यांना आनंदाच्या उकाळ्या फुटतात त्यास महाराष्ट्रीय मातीचा माणूस कधीच म्हणता येणार नाही.

मिंधेंसमोर सत्तेची हाडके

शिवसेनेतील एका ‘डरपोक’ गटास आपले लाचार व मिंधे बनवून त्याच्या समोर सत्तेची हाडके टाकली गेली. हा कुणास बदला वगैरे वाटत असेल तर महाराष्ट्राची 11 कोटी जनता या बदल्याचा महासूड घेतल्याशिवाय राहणार नाही. अंधेरीच्या पोटनिवडणुकीतील विजयाने ते सिद्ध झाले आहे. लोकांची आजही शिवसेनेवर श्रद्धा आहे. त्या शिवसेनेचे नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT