Dipesh Mhatre Sarkarnama
मुंबई

BJP-Shivsena on Deepesh Mhatre : 'ते' गेले बरेच झाले, भाजपचा सूर ; तर 'त्यांच्या' जाण्याने फरक पडणार नाही शिवसेनेचे म्हणणे!

शर्मिला वाळुंज

Dombivli Assembly Constituency Politics : शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी रविवारी ठाकरे गटात प्रवेश केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे ते निकटवर्तीय होते. म्हात्रे यांच्या पक्ष बदलाने शिंदे गटासोबतच भाजपला याचा मोठा फटका बसेल असे बोलले जात आहे. एका अर्थाने बरेच झाले ते गेले असे भाजप पदाधिकारी म्हणत आहेत. तर त्यांच्या जाण्याने पक्षाला फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया शिंदे गटातून उमटत आहे. मात्र म्हात्रे यांना ठाकरे गटाकडून तिकीट दिले गेल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी 6 माजी नगरसेवकांसह ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला आहे. म्हात्रे यांच्या जाण्याने शिवसेना(Shivsena) शिंदे गटाला खिंडार पडले आहे.

भाजपसाठी(BJP) देखील हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूकित महायुतीच्या उमेदवारास टक्कर देण्यासाठी ठाकरे गटात शिंदेंचा शिलेदार गेल्याची चर्चा आहे. दीपेश शिंदे हे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांचे पुत्र असून राजकारणातील त्यांचा अनुभव पाहता ही निवडणूक आता म्हणावी तेवढी सोप्पी भाजपसाठी नसणार आहे अशी चर्चा सुरु आहे. तसेच केवळ उद्धव ठाकरेच नाही तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचा देखील हात दीपेश यांच्या पाठीवर आहे.

दीपेश यांच्या पक्ष प्रवेशानंतर महायुतीच्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शिवसेना शिंदे गटात यावर फारसे कोणी काही बोलण्यास तयार नाहीत. मात्र शिवसैनिक मनोमन काहीसे खुश असल्याचे खासगीत बोलले जात आहे. यामुळे पक्षाकडून उमेदवारी घोषित झाल्यानंतर खरे वातावरण स्पष्ट होईल.

शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले, ते पक्षाचे वजनदार नेते होते. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. परंतु कोणी जाण्याने एखाद्या पक्षाचे काही नुकसान होत नाही. व्यक्ती पुढे पक्ष नसतो पक्षामुळे ती व्यक्ती असते. पक्ष ही संघटना आहे. संघटना एखाद दुसऱ्यामुळे चालत नाही. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे आहेत, आम्ही त्यांचे पाईक आहोत. त्यामुळे एक गेल्याने काहीच नुकसान झालेले नाही असे भोईर म्हणाले.

तर भाजपचे कल्याण लोकसभा निवडणुक प्रमुख शशिकांत कांबळे म्हणाले, लोकांचा त्यांच्यावर रोष होता. ते स्वतःहून बाहेर पडले ते बरच झालं. आता नक्कीच महायुतीचे मतदान वाढून आमच्या मनातली जी आकडेवारी आहे ती आता मिळेल. ते दाखवत होते आम्ही एकच आहोत, पण असं कधी दिसत नव्हतं, वाटत नव्हतं. त्यामुळे गेले ते बरेच झाले. डोंबिवलीकरांच्या मनातले आमदार हे रवींद्र चव्हाण आहेत. खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीत विकास कामे होतील. आमचे आमदार रवींद्र चव्हाण हेच असतील याचा आम्हाला विश्वास आहे असे ते म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT