Why Vikas and Kavita Mhatre Quit BJP - ''भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण हे येथील नेतृत्व करतात. राजूनगर तसेच गरिबाचा वाडा प्रभागातील विकासासाठी मी वारंवार निधीची मागणी करतो मात्र मला विकास कामांसाठी निधी पुरेसा दिला जात नाही. आमच्या बाजूला शिवसेना व मनसेच्या नगरसेवकांचे प्रभाग आहेत तिकडे चारपट निधी भाजप पक्षाकडून दिला जातो. माझ्यावर त्यांची काय नाराजी आहे मला माहित नाही.'', असे म्हणत भाजपाचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी पक्ष नेतृत्वाविषयी आपली नाराजी उघड केली. भाजपला सोडचिठ्ठी देऊन ज्या पक्षात आपल्याला मानसन्मान मिळेल तिकडे जाण्याचा आपला विचार असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.
डोंबिवली पश्चिमेतील भाजपचे पदाधिकारी विकास म्हात्रे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी गुरुवारी पक्षाच्या पदाचा राजीनामा वरिष्ठांना पत्रव्यवहार करून कळवला आहे. पक्ष नेतृत्व सहकार्य करत नाही. विकास कामासाठी निधी देत नाही म्हणत म्हात्रे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
मीडियाशी बोलताना विकास म्हात्रे म्हणाले, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचा हा मतदारसंघ आहे शिवाय ते भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा होती. माझी पत्नी कविता आणि माझा राजू नगर आणि गरिबाचा वाडा असे दोन प्रभाग आहे. येथील लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम पाहत आहोत. या भागामध्ये रस्त्यांचा तसेच पाण्याचा प्रश्न जटील आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी मी त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत आहे. तसेच निधीची देखील मागणी करत आहे. मात्र मला पुरेसा निधी दिला गेलेला नाही.
तसेच, माझ्या बाजूच्या प्रभागांमध्ये जिथे शिवसेनेचे तसेच मनसेचे नगरसेवक आहेत, त्या प्रभागांना भरघोस निधी मिळतो मात्र माझ्या प्रभागातील विकास कामांसाठी निधी दिला जात नाही. आतापर्यंत मला केवळ चार कोटींचा निधी दिला गेला आहे. शिवसेना व मनसेच्या नगरसेवकांना आमच्यापेक्षा चारपट निधी दिला जातो. पक्ष नेतृत्वाचे आमच्यावर काय नाराजी आहे मला माहित नाही. कल्याण डोंबिवलीत प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर विकास कामांसाठी आमदारांकडे वारंवार कामांसाठी पाठपुरावा करत होतो, परंतु आम्हाला त्यात यश आले नाही. मी वारंवार विकास कामांसाठी भांडत आलो परंतु मला विकासापासून डावललं जात आहे. चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मी आणि माझ्या पत्नीने पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
याशिवाय, पक्षाकडून मान सन्मान मिळत नसल्याने जिथे आपल्याला मान सन्मान मिळेल तसेच आमच्या प्रभागातील विकास कामांसाठी निधी दिला जाईल, त्या पक्षात जाण्याचा मी नक्कीच विचार करेन, असे म्हात्रे यांनी सांगितले.
तर प्राप्त माहितीनुसार म्हात्रे हे शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे पक्षात जाण्याची शक्यता आहे अशी ही चर्चा आहे. यावर ते म्हणाले, जिथे सन्मान मिळेल तिकडे जाणार. यामुळे भाजपाचे दोन नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे तूर्तास तरी स्पष्ट झाले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.