Controversy Erupts in Kalyan-Dombivli Over Nandu Parab's Remark on Raj Thackeray; BJP Leaders Resign sarkarnama
मुंबई

KDMC : राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख, ब्रिजभूषण सिंहला सलाम; भाजप जिल्हाध्यक्षांच्या वक्तव्याने नवा वाद; पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा; मनसेकडून सत्कार

Nandu Parab MNS Raj Thackeray : भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी राज ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्याचा विरोधा भाजपमधील पदाधिकाऱ्यांनीच करत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

शर्मिला वाळुंज

Nandu Parab News : भाजपाचे कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी हिंदीत भाषण करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. परब म्हणाले होते की, “ब्रिजभूषण सिंह यांना मी सलाम ठोकतो. त्यांनी एकच धक्का दिला. उत्तर प्रदेशमध्ये येऊन दाखव.राज ठाकरे गेले नाहीत, उत्तर भारतीय माणसाने दाखवून दिलं.''

परब यांच्या वक्तव्याचे पडसाद भाजपमध्ये देखील उमटले आहे. भाजपचे कल्याण पूर्व मंडल शिक्षक आघाडीचे सचिव दुर्गेश बागुल यांनी गुरुवारी पक्षाच्या पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला विरोध करत बागुल यांनी समाजमाध्यमांवरून आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना बोलावून त्यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे बागुल यांनी सांगितले.

“मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता होतो. देशभक्त पक्ष म्हणून मी भाजपमध्ये होतो आणि वेळोवेळी पक्षाचे समर्थन केले. मात्र, मुद्दा मराठी अस्मितेचा येतो तेव्हा नंदू परब यांनी मांडलेली भूमिका मला मान्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील चर्चेचा मुद्दा आम्हाला मान्य होता. मात्र, त्यामध्ये ब्रिजभूषण सिंह यांना आणण्याची गरज नव्हती. त्यांचे उदाहरण देऊन आम्हाला भूमिका समजावण्याची आवश्यकता नव्हती,” असे बागुल यांनी सांगितले.

आपली भूमिका मांडल्यानंतर पक्षातील काही पदाधिकारी नाराज झाल्याने आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “भाजप सोडताना मला अतोनात दुःख होत आहे. कल्याण पूर्वचे आमदार आणि पक्षाने आमच्यासाठी रस्ते, पाणी, वीज, गटार यांसह अनेक कामे केली आहेत. त्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे. मात्र, मराठीच्या भूमिकेवर तडजोड करता येणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे,” असे ते म्हणाले.

आपण कोणत्याही अन्य पक्षात प्रवेश करणार नसल्याचेही बागुल यांनी स्पष्ट केले. त्यांच्या भूमिकेचे समर्थन करत मनसेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. बागुल यांच्या राजीनाम्यामुळे कल्याण पूर्वेतील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सूरज इंगळेंचाही राजीनामा

बागुल यांच्या राजीनाम्यानंतर ​कल्याण पूर्वेतील भाजपचे चिटणीस सूरज इंगळे यांनी देखील राजीनामा दिला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “आमदारांमुळे नाही, तर जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे मी राजीनामा देत आहे.'' भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांची आगामी राजकीय वाटचाल नेमकी कशी असेल, याबाबत त्यांनी अद्याप कोणताही खुलासा केला नसला तरी, मराठीच्या सन्मानार्थ आपण हा पक्ष सोडल्याचा अभिमान असल्याच्या भावना ते व्यक्त करीत आहेत. एकापाठोपाठ एक राजीनामे सत्र सुरू झाल्यामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT