Devendra Fadnavis, sanjay Raut, Chitra Wagh Sarkarnama
मुंबई

BJP Vs Shivsena UBT : राऊतांच्या टीकेचा हिशेब चुकता; भाजपच्या महिला नेत्यानं 'मविआ'च्या काळातील 'त्या' घटनांचा पाढाच वाचला

Jagdish Patil

Chitra Wagh On Sanjay Raut : 'विरोधकांवर गरळ ओकण्याबरोबरच हल्ली तुम्ही विनोदीही बोलायला लागलात वाटतं. महाराष्ट्राच्या इतिहासात 'महाभकास बिघाडी'च्या काळात सर्वात जास्त ढासळलेली कायदा सुव्यवस्था जनतेनं अनुभवली आहे,' अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केल्याच्या घटनेवर बोलताना महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले होते.

संजय राऊत यांच्या टीकेला आणि आरोपांना चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या एक्स अकाऊंटवर त्यांनी याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेल्या अनेक प्रकरणाची आठवण करुन दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी लिहिलं, "अहो रडतरौत सर्वज्ञानी, विरोधकांवर गरळ ओकण्याबरोबरच हल्ली तुम्ही विनोदीही बोलायला लागलात वाटतं. महाराष्ट्राच्या इतिहासात 'महाभकास बिघाडी'च्या काळात सर्वात जास्त ढासळलेली कायदा सुव्यवस्था जनतेनं अनुभवली आहे.

त्याच काळात सचिन वाझेच्या माध्यमातून उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानापुढं खंडणीच्या धमकीसाठी स्फोटके ठेवण्यात आली होती ना, विसरलात का? पालघरमध्ये मारण्यात आलेल्या साधूंचे शिव्याशाप आयुष्यभर भोगत आहातच. वाधवानप्रकरण, पत्रकारांना अटक हे मुद्दे, जनता विसरलेली नाही.

तसंच शंभर कोटीचे वसुलीप्रकरण, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना बेकायदा ताब्यात घेणे, कंगना राणावत आणि नवनीत राणा यांना सूड भावनेपोटी दिलेला त्रास, विसरलात का सर्वज्ञानी? अहो, तुमचे गृहमंत्रीसुद्धा जेलवारी करून आले आहेत. तुम्ही स्वतः त्या काळातील तुमचे एक मंत्री आणि गृहमंत्री जामिनावर बाहेर आहात, याची वारंवार आठवण करून द्यायची का?" असे प्रश्न विचारत वाघ यांनी राऊतांना डिवचलं आहे.

त्यांनी पुढे लिहिलं आहे की, रडतरौत सर्वज्ञानी, स्वतःची पाठ थोपटून घेण्यात तुमची 'महाभकास बिघाडी' आणि तुमचे वाचाळवीर नेहमीच तत्पर असतात. 'महायुती' च्या नावानं खडे फोडत खुशाल खुशीत गाजरे खा. राज्यातील जनतेनं निर्णय घेऊन टाकला आहे, पुन्हा एकदा महायुती सरकार कडे सत्ता देण्याचा! तुमच्यासारखे थापाडे त्यांना नको आहेत, बरं का."

संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलं होतं?

आमदारांच्या गाड्यांवरील हल्ल्या प्रकरणी बोलताना राऊत म्हणाले, "एक आमदार सत्ताधारी पक्षाचा तर दुसरा आमदार जितेंद्र आव्हाड, जे विरोधी पक्षाचे आहेत. दोघांवर हल्ला झाला. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे? महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे आणि ते कायद्यासाठी ओळखले जाते. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात राज्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत होती. सध्या राज्यात दहशतीचे राजकारण केले जात आहे, आणि त्याचे नियंत्रण दिल्ली आणि गुजरातमधून केले जात आहे, ज्याची किंमत आम्ही चुकवत आहोत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT