Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  sarkarnama
मुंबई

राज्यात राष्ट्रपती राजवट ही भाजपची अधिकृत मागणी नाही : फडणवीसांनी केलं स्पष्ट

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकार पाडण्यासाठी, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी भाजप (BJP) प्रयत्न करत असल्याचा आरोप आघाडीतील नेत्यांकडून सातत्याने केला जातो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह काही नेत्यांनी अनेकदा राष्ट्रपती राजवटीचा उल्लेखही केला आहे. माजी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी नुकतीच ही मागणी केली. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भाजप नेत्यांच्या राष्ट्रपती राजवटीच्या (President Rule) मागणीवर कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी भाजपची अशी कुठलीही अधिकृत मागणी नसल्याचे स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेधही फडणवीस यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना व काँग्रेसच्या काही नेत्यांनी या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यावरून फडणवीस चांगलेच भडकले. सगळ्या पक्षांमध्ये अल्पबुध्दीची काही लोकं असतात. अशीच लोकं असं वक्तव्य करतात, अशा शब्दांत फडणवीसांनी टीकाकारांना सुनावलं.

फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्ही एसटी कर्मचाऱ्यांसोबत होतो. सातत्याने प्रश्न लावून धरले. पण सरकारने प्रचंड आडमुठी भूमिका घेतली. विलीनीकरण करायचे नसेल तर दोन पावले पुढे येऊन मार्ग कसा काढता येईल, असं मी सांगितलं होतं. पण पाच महिने संप चिघळवत ठेवला. तो चुकीचा होता. कर्मचाऱ्यांचा उद्रेक आजही सुरू आहे. पण पवारसाहेबांच्या घरावर घडलेली घटना चुकीची आहे. त्याचा आम्ही निषेधच करतो.

हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस संतापले. सगळ्या पक्षांमध्ये काही अल्पबुध्दीची लोकं असतात. अशा अल्पबुध्दीची लोकं असं वक्तव्य करत असतात. भाजप मागून वार करणारा पक्ष नाही. आम्ही समोरून वार करणारे लोकं आहोत. पवारसाहेबच काय पण कुठल्याही नेत्याच्या घरावर असा हल्ला होणे, निषेधार्ह आहे. पण माझा पुन्हा सवाल आहे की, पत्रकारांना एक तास आधी माहिती मिळते की लोकं जाणार आहेत. आणि पोलिस झोपले होते. खरा सवाल पोलिसांना विचारला पाहिजे. सत्ता पक्षातील कमी बुध्दीची लोकं भाजपवर आरोप करत आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे, की पत्रकार पोहचत आहेत पण पोलीस पोहचत नाहीत. हे त्यांच्याही लक्षात आले आहे. या लाजेखातरचं ते विषय भरकवटत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.

पटोलेंना ही जुनीच सवय

नाना पटोले यांनी मशिदीवरील भोंग्यांवरून भाजप टीका केली आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, नाना पटोलेंना न पाहता, न समजता, न विचार करता बोलण्याची जुनीच सवय आहे. आमच्याकडे असतानाही तेच बोलत होते. त्यांना भगव्याचा एवढा का राग आहे. एवढा तिटकारा का आहे. भगवं म्हटल्यावर धर्मांधता का दिसते. त्याचवेळी इतर धर्माचा विचार आला की त्यांचं लांगूनचालन का करतात. या प्रवृत्तींमुळेच शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचार अडचणीत आला आहे. त्यांना कितीही भगव्याचा तिटकारा असला तरी हा छत्रपतींचा भगवा आम्ही पुढे घेऊन जाणारच, असं फडणवीस यांनी नमूद केलं.

पृथ्वीराज पाटील यांना पाच लाख रुपये

महाराष्ट्र केसरी या मानाच्या कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील यांनी 25 वर्षांनंतर मानाचा पुरस्कार कोल्हापूरला पुन्हा मिळवून दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निर्णय घेतला आहे की, कोल्हापूरच्या या पैलवानाचा सत्कार भाजप करेल. आणि भाजपकडून त्यांना पाच लाख रुपये पुढच्या सरावासाठी दिले जातील, असं फडणवीस यांनी यावेळी जाहीर केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT