Dhananjaya Mahadik and Hitendra Thakur
Dhananjaya Mahadik and Hitendra Thakur  Sarkarnama
मुंबई

महाडिकांच्या गळाला एकदम तीन आमदार? मतांच्या गोळाबेरजेसाठी थेट हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी मैदानात उतरलेले भाजपचे (BJP) उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी आता राजकीय गोळाबेरजेला सुरवात केली आहे. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे (बविआ) हितेंद्र ठाकूर यांची आज विरारमध्ये भेट घेतली. बविआचे तीन आमदार आहेत. त्यामुळे त्यांना आपल्याकडं वळवण्यात महाडिक यशस्वी झाले असल्याची चर्चा आहे. याचा फटका महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) बसण्याची शक्यता आहे. (Rajya Sabha Election News)

धनंजय महाडिक यांनी आज हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. महाडिक हे सध्या स्वत: मतांची गोळाबेरीज करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्याचाच भाग म्हणून ही भेट झाली. यामुळं बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, आणि राजेश पाटील हे तिन्ही आमदार भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे. याचबरोबर मागील काही दिवसांपासून ठाकूर कुटुंबीयांच्या मागे सक्त वसुली संचालनालयाचा (ईडी) ससेमिरा लागला आहे. यातून सुटका करून घेण्यासाठी ठाकूर कुटुंबीय भाजपला साथ देण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेने आपले लक्ष वसई-विरार आणि पालघरकडे वळवले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे तर गेल्या काही वर्षांत पालघर जिल्ह्यात चांगलेच सक्रिय झाले आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीची डोकेदुखी वाढत चालली आहे. वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यामुळे एकहाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. या कारणांमुळे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी बहुजन विकास आघाडी भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेसाठी बहुन विकास आघाडीने सुरवातीला पाठिंबा दिला होता. ठाकूर यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिली होती. तेथे त्यामुळे त्यांचा शिवसेनेशी सामना झाला होता. नंतर मात्र, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत नसल्याचे लक्षात येताच ठाकूर हे महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन मोकळे झाल्याचे तेव्हा बोलले जात होते.

शिवसेनेने आपला मुख्यमंत्री झाल्यानंतर तेथे विस्तारासाठी आणि ताकद वाढविण्यासाठी जोर लावला. त्यातही येथे आतापर्यंतचा राजकीय सामना हा शिवसेना विरुद्ध ठाकूर कुटुंबीय असाच राहिला. त्यामुळे सत्ता आल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणे शिवसेनेला शक्य नव्हते. त्यातही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे. सत्तेत आल्यानंतर शिवसेनेने त्रास दिला, अशी आघाडीची मनोभूमिका झाली आहे. या साऱ्या परिस्थितीत बहुजन विकास आघाडी अखेर काय निर्णय घेते, हे पाहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT