Mohit Kamboj
Mohit Kamboj Sarkarnama
मुंबई

हॉटेल ललितमध्ये कबाब, शबाब, शराब अन् नवाब ही जुगलबंदी!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आर्यन खानचे अपहरण व खंडणीचे षडयंत्र भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनीच रचल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांनी (Nawab Malik) केला आहे. तसेच कंबोज हेही वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीचा हिस्सा असल्याचा दावाही मलिकांनी केला आहे. त्याला कंबोज यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलं आहे. ललित हॉटेलमध्ये प्रायव्हेट आर्मी एकत्र यायची, या मलिकांच्या आरोपांवर कंबोज यांनी पलटवार केला आहे.

ललित हॉटेलमध्ये मागील पाच वर्षांत एकदाही गेलो नसल्याचे सांगत कंबोज म्हणाले, मलिकांनी हा विषय स्वत:हून काढला हे बरे झाले. आता त्यांचेच सरकार सत्तेत आहे. त्यांनी या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज काढावे. त्यातून सर्वकाही पुढे येईल. हा खूप गंभीर विषय असून महाराष्ट्र पोलिसांनी आजच सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावे. मलिकांच्या म्हणण्यानुसार मी खूप मोठा व्यक्ती आहे, त्यामुळे त्यात त्यात छेडछाड होऊ शकते.

हे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर कबाब, शबाब, शराब और नवाब ही जुगलबंदी कशी सुरू होती, हे लपवू नका, असं कंबोज म्हणाले आहेत. कंबोज यांनी थेट मलिकांचा संबंध ललितशी जोडला आहे. सुनिल पाटील याचा मलिकांशी वीस वर्षांपासूनचा संबंध आहे. आता सुनिल पाटील उघडा पडल्याने ते खोटे आरोप करू लागले आहेत. पाटील व सॅम डिसोझाचे संबंध पुढे आले आहे. पाटील घराला कुलूप लावून का पळून गेला, राष्ट्रवादीशी त्याचे काय संबंध होते, याचे उत्तर मलिकांनी द्यावे, असंही कंबोज म्हणाले.

आता त्यांच्याच भाषेत उत्तर देणार

मलिकांच्या आरोपांना उत्तर देताना कंबोज यांनी त्यांच्या भाषेत यापुढे उत्तर देणार असल्याचा इशारा दिला. मी त्यांच्या सलीम-जावेदच्या चित्रपटाला बंद करणार आहे. त्यांच्याच भाषेत उत्तर देणार आहे. सुनिल पाटीलाच भंडाफोड झाल्याने आता त्यांच्याकडे याचं उत्तर नाही. सुनिल पाटील याचं नाव अनिल देशमुखांच्या चौकशीतही समोर आले आहे. सुनिल पाटील घर सोडून का पळून गेला. त्याला पुढे आणायला हवे. मी न्यायालयात गेलो आहे. मलिकांना मी 15 कायदेशीर नोटीस पाठवल्या आहेत. मग त्यांनी अद्याप उत्तर का दिले नाही, असं कंबोज म्हणाले.

दरम्यान, मलिक यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत कंबोज यांच्यासह वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुनिल पाटील हा राष्ट्रवादीचा सदस्य नसल्याचे सांगत मलिक म्हणाले, क्रूझ ड्रग्ज प्रकरणात तीन लोकांना सोडण्यातच सर्वात मोठा खेळ होता. ऋषभ सचदेवा हाही त्यात होता. तो मोहित कंबोज यांचा भाचा आहे. कंबोज हे देशात भाजपची सत्ता बनण्याआधी काँग्रेस नेत्यांच्या मागे फिरत होते. 1100 कोटी रुपयांचा बँक घोटाळा करणारा हा व्यक्ती देशात सत्ताबदल होताच भाजपमध्ये गेले. पैशांच्या जोरावर युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या घोटाळ्याची तक्रार सीबीआय व ईडीकडे होते. दीड वर्षांपूर्वी सीबीआयने छापेमारी केली होती. त्यानंतर हे प्रकरण दाबण्यात आले.

मागील एक महिन्यापासून कंबोज पूर्णपणे घाबरले आहेत. न्यायालयाच्या सुनावणीत सतत हा मुद्दा आला की, क्रुझवर आर्यन तो तिकीट काढून गेला नाही. प्रतिक गाबा व अमिर फर्निचरवालासोबत गेला. हे प्रकरण अपहरण व खंडणीचे आहे. मोहित कंबोजद्वारे ट्रॅप लावण्यात आला. आर्यन खानला तिथे पोहचवले होते. त्यानंतर अपहरण करून 25 कोटींच्या खंडणीचा खेळ सुरू झाला. डील 18 कोटींची झाली अन् 50 लाख घेतले. पण एका सेल्फीने खेळ बिघडवला, असे मलिक म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT