Uddhav Thackeray & Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray & Ajit Pawar : उध्दव ठाकरे - अजितदादा भेटीवर भाजप नेत्याची खोचक टिप्पणी; म्हणाले, '' ते संबंध जपण्यात...''

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा टि्वस्ट आला. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झाला. याचदरम्यान, महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींना 'सळो की पळो' करून सोडणारे भाजप नेते किरीट सोमय्या हे कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. एकीकडे यावरुन राजकीय वातावरण तापलं असतानाच शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीवर आता भाजप नेत्यानं खोचक टोला लगावला आहे.

बेंगळूरू येथे विरोधकांच्या बैठकील उपस्थित राहिल्यानंतर माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे हे विधीमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अर्थात बुधवारी( दि.१९) कामकाजात सहभागी होण्यासाठी सभागृहात उपस्थित राहिले. याचवेळी उध्दव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच भेटीवरुन भाजप नेते व माजी खासदार निलेश राणेनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

ट्विटमध्ये काय म्हटलंय...?

भाजप नेते यांनी निलेश राणे(Nilesh Rane) हे नेहमीच महाविकास आघाडीच्या त्यात ठाकरे कुटुंबावर सडकून टीका करत असतात. आता उध्दव ठाकरेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ट्विट करत निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. राणे म्हणाले,'' उद्धव ठाकरे विधान भवनात जाऊन फक्त अजित पवारांना भेटले, अजित पवार संबंध जपण्यात हुशार दिसतात..'' असा खोचक टिप्पणी राणे यांनी यावेळी ट्विटमध्ये केली आहे.

अजित पवारांच्या भेटीनंतर ठाकरे काय म्हणाले..?

उध्दव ठाकरे यांनी विधीमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्या भेटीबाबत खुलासा केला. ठाकरे म्हणाले, '' अजित पवार हे अडीच वर्षे माझ्याबरोबर होते. मला खात्री आहे की सत्तेचे डावपेच इतर लोकांकडून सुरु असले तरीही अजित पवारांकडून जनतेला मदत होईल. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे दिल्या गेल्या आहेत परत त्यामुळे हे शक्य आहे'', असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

'' सध्या सत्तेची जी काही साठमारी चाललीय, त्यात...''

उध्दव ठाकरेंनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांनी चांगलं काम करावं अशा शुभेच्छा मी त्यांना दिल्या. सध्या जी काही सत्तेची साठमारी चालली आहे, त्यात राज्यातील प्रश्न महत्त्वाचे आहेत. पाऊस सुरु झाला आहे, पूरस्थिती आहे. शेतकरी पाऊस नसल्याने हवालदिल झाला होता, आता कदाचित अतिवृष्टीमुळे हवालदिल होईल. मात्र, सत्तेची साठमारी सुरु आहे अशात जो मूळ आपला शेतकरी आहे, राज्याचा नागरिक आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका अशी विनंतीही अजित पवारांना केल्याचं ठाकरेंनी यावेळी सांगितले.

'' मी असे किळसवाणे आणि बिभत्स...

विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. यावेळी ठाकरे म्हणाले, ''मी असे किळसवाणे आणि बिभत्स व्हिडिओ बघत नाही. परंतु, त्यावर राज्यातील जनतेने खास करून माता-भगिनींनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मला वाटतं त्यांच्या भावनांची कदर या सरकारने केली पाहिजे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT