CM Eknath Shinde & Ravindra Chavan Latest News
CM Eknath Shinde & Ravindra Chavan Latest News  Sarkarnama
मुंबई

भाजपच्या मंत्र्याची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका; शिंदे गट आक्रमक...

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार एकत्र चूल मांडत सरकारचा गाडा गुण्यागोविंदाने हाकत आहेत. कल्याण डोंबिवली मध्ये मात्र रस्ते विकास निधीवरून शिंदे फडणवीस सरकार मधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

470 कोटींचा रस्ते विकास निधी तत्कालीन नगरविकास मंत्री शिंदे यांनी रद्द केला होता. तेव्हा केलेले पाप धुवून काढा,असा उपहासात्मक टोला कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवारी लगावला होता. त्यावर शिंदे गटाचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी पलटवार केला असून, चव्हाण साहेब विसरले की ते कॅबिनेट मंत्री आहेत. मागील 13 वर्षात त्यांनी विकास कामे रखडवून जे पाप केले ते झाकण्यासाठी आरोप करत आहे, असा पलटवार त्यांनी मंत्री चव्हाणांवर केला आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दौरा झाला. शहरातील विकास कामावरून पालिका प्रशासनावर झोड उठवली. त्यानंतर डोंबिवलीत रविवारी आयोजित एका खासगी कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी राज्यात भाजपाची सत्ता असताना, 472 कोटीचे रस्ते मंजूर करून घेत या रस्त्याचा डीपीआर तयार करत निविदा देखील काढल्या होत्या. मात्र त्यानंतर सरकार गेल्याने नंतरच्या सरकार मधल्या कोणाला तरी दुर्बुद्धी सुचली आणि वित्तीय मान्यता असलेला निधी रद्द करण्यात आला. ज्यांनी कोणी रद्द केला त्यांनीच हा निधी पुन्हा मंजूर करण्याची जबाबदारी असल्याचे सांगत ते पुन्हा मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. प्रस्ताव पुन्हा सादर करा,असे लिहिलं होत पण त्याला सुद्धा एक महिना झालाय. त्यामुळेच केलेले पाप आता धुवून टाका, असा उपहासात्मक टोला चव्हाणांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला होता.

शिंदे गटाचे पदाधिकारी दिपेश म्हात्रे म्हणाले की, चव्हाण साहेब कदाचित विसरले आहेत की ते कॅबिनेट मंत्री झालेत. गेले दोन वर्ष त्यांनी आरोप-प्रत्यारोप करण्यामध्ये घालवले. 470 कोटीचा कुठलाही निधी मंजूर झाला नसताना वारंवार सांगायचे की 470 कोटी मंजूर झाले होते ते रद्द केले.

370 कोटी मंजूर झाले ते कोणी सांगत नाही? माझा त्यांना सवाल आहे की 13 वर्षात त्यांनी डोंबिवलीमध्ये विकास काम रखडवून जे पाप केले आहे ते लपवण्यासाठी कदाचित ते आरोप करत असतील असे म्हात्रे म्हणाले. डोंबिवलीमध्ये येणारे दोन मुख्य रस्ते मानपाडा रोड आणि घरडा सर्कलने पेंढारकर कॉलेज कडे जाणारा रस्ता. हे दोन महत्त्वाचे रस्ते असून पीडब्ल्यूडीच्या अंर्तगत ते येतात त्यांनी काल बोलताना सांगितले की 72 तासात खड्डे बुजवले पाहिजे. त्यांना मंत्री होऊन तर दीड महिना झाला. दीड महिन्यात ते दोन रस्त्यावरील देखील खड्डे बुजू शकले नाही. डोंबिवलीकरांना जरासाही दिलासा देऊ शकले नाही. तर माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांना लोकांच्या प्रचंड अपेक्षा आहेत. आपल्याकडं त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण कराव्या.

ते मुख्यमंत्र्यांबरोबर गुवाहाटीला देखील होते. विमानात देखील त्यांच्या बाजूलाच ते बसले होते. त्यांनी तेव्हाच मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगायला पाहिजे होतं.आता रस्ते काम निधी तुम्ही करा आम्ही आधीच 370 करोड दिलेले आहेत म्हणून माझं म्हणणं आहे की, चव्हाण साहेबांनी आपली पाप झाकण्यासाठी दुसऱ्यावरती आरोप करणं बंद करावं,असा सल्ला देखील म्हात्रेंनी चव्हाण यांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT