Disha Salian, Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

BJP Politics : भाजपचं लक्ष्य, निवडणुकीआधी ठाकरेंचा बंदोबस्त

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

Mumbai Political News :

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा राजकीय धमाका करण्याचा भाजपाचा प्लॅन आहे. सूरज चव्हाण यांना अटक केल्यानंतर खुद्द आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्लॅन ठरल्याची माहिती मिळत आहे. पुढील महिन्यात आदित्य ठाकरेंना चौकशीसाठी बोलावून किंवा प्रसंगी अटक करून त्यांची कोंडी करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हिवाळी अधिवेशनात दिशा सालियान (Disha Salian) मृत्यूप्रकरणी शिंदे सरकारने एसआयटी चौकशीचा निर्णय घेतला होता. आता या दिशेने पाऊल टाकण्यात येत असून पुढच्या महिन्यात आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) आधी चौकशी आणि अटकेचा विचार केला जात आहे. पण हा निर्णय घेण्यापूर्वी या चौकशीचे किंवा प्रसंगी अटकेचे काय पडसाद उमटू शकतात, याचा भाजप विचार करीत आहे, असे समजते.

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तोंडावर आदित्य ठाकरेंची चौकशी किंवा त्यांना अटक झाल्यास उद्धव ठाकरे शिवसेनेला त्याचा मोठा फायदा होणार असेल तर ही चौकशी लांबणीवर पडू शकते, तर दुसऱ्या बाजूला आदित्य यांच्याभोवतीसुद्धा आम्ही फास आवळू शकतो, हे दाखवून भाजप (BJP) मतदारांना एक वेगळा मेसेज देत मतांची बेरीजसुद्धा करू शकते.

सध्या सहानभूतीची लाट उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असल्याने आदित्य ठाकरेंची चौकशी किंवा अटक या लाटेत आणखी भर पडणार नाही ना, याचीसुद्धा चाचपणी केली जात आहे.

गेल्या काही दिवसांत रवींद्र वायकर (Ravindra Waikar), ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण आणि आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची संबंधित यंत्रणांकडून चौकशी झाली आहे. त्यातच आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज यांना थेट अटक करीत सत्ताधारी भाजपने 'मातोश्री'ला एक इशारा दिला आहे. आता थेट आदित्य ठाकरेंची आधी चौकशी आणि नंतर अटक करीत एकच धमाका उडवून देण्याचा भाजपचा विचार आहे. मात्र असे काही करण्यापूर्वी एकदा दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना विश्वासात घेण्यात येईल. त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यास वेगाने घडामोडी होऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिशा सालियानप्रकरणी चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. चौकशीची मागणी सातत्याने काही आमदार करीत असल्याने कारण सांगत उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

दिशा सालियानचा मृत्यू झाला तेव्हा आदित्य ठाकरे नेमके कुठे होते? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असल्याने आदित्य यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. याशिवाय मुंबई हायकोर्टात आदित्य ठाकरेंविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी करणारी याचिका राशिद खान पठाण यांनी दाखल केली आहे. आदित्य यांच्या वकिलांकडून या प्रकरणात कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. कोर्टाने कोणताही निर्देश देण्यापूर्वी आदित्य ठाकरेंची बाजू ऐकून घेण्याची विनंती कॅव्हेटमधून करण्यात आली आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा 14 जून 2020 या दिवशी मृत्यू झाला. सुशांतच्या मृत्यूच्या पाच दिवस आधी त्याची माजी मॅनेजर दिशा सालियानचा मृत्यू झाला. तिचा 9 जून 2020 ला संशयितरीत्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मुंबईच्या मालाडमधल्या एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून कोसळून तिचा मृत्यू झाल्याची माहिती तेव्हा समोर आली. नंतर तिच्या मृत्यूचा सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंध असल्याचं बोलले गेले. याच प्रकरणात आता आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

(संजय परब हे मुंबईस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT