Narendra Patil -Minister Eknath Shinde
Narendra Patil -Minister Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Narendra Patil On Shinde : सरकारला ७ महिने झाले अन॒ मुख्यमंत्री शिंदेंवर पाहिला हल्लाबोल भाजप उपाध्यक्षानेच केला...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यातील शिंदे (Eknath Shinde)-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारला सत्तेवर येऊन ३० जानेवारी रोजी सात महिने पूर्ण झाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पहिला हल्लाबोल भाजपचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केला. ‘मुख्यमंत्र्यांचा चांगुलपणा स्वतःसाठी, त्याचा समाजाला फायदा होत नाही,’ असा आरोप करून ‘एक तारखेनंतर मंत्र्यांच्या गाड्या अडवू,’ असा खणखणीत इशाराही पाटील यांनी शिंदे सरकारला दिला आहे. (BJP state vice president Narendra Patil criticized Chief Minister Eknath Shinde)

माथाडी कामगारांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे एक फेब्रुवारी रोजी माथाडी कामगारांचे आंदोलन आहे, त्यामुळे नवी मुंबईचे मार्केट बंद राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत नरेंद्र पाटील यांनी सरकार विशेषतः मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चांगुलपणा स्वतःसाठी, त्याचा समाजाला फायदा होत नाही. सरकार गोरगरिबांचे आहे, असे सांगितलं जाते. मात्र, या गोरगरिबांकडेच सरकारचे दुर्लक्ष होत आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

नरेंद्र पाटील म्हणाले की, नव्या सरकारकडून सर्वांची जशी अपेक्षा आहे, तशी आमच्या माथाडी कामगारांचीही अपेक्षा आहे. पण, दुर्भाग्याने आमच्या अपेक्षांचा भंग झालेला आहे. माथाडी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळोवेळी भेटलो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्र्यांनाही भेटलो. त्यांना निवेदनं देतो, ती निवेदने कुठल्यातरी फाईलला लावून ठेवलेली असतात. पण, बैठका लागत नाही. आमचा विरोध त्याला आहे, तुम्ही निवेदने घेता. त्यावर सह्या करता आणि त्याच्यामध्ये नोटिंग करता. पण, त्यासंदर्भात बैठका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे माथाडी कामगारांना न्याय मिळत नसेल तर आम्हाला पर्याय नाही. अण्णासाहेब पाटील यांच्या संघटनेने बंद पुकारलेला आहे आणि आम्ही हा बंद यशस्वी करून दाखवू.

'मंत्र्यांचा गाड्या नवी मुंबईबाहेर जाऊ देणार नाही'

आम्ही एक फेब्रुवारी रोजी बंद पुकारला आहे. अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बैठकीसंदर्भात निरोप आलेला नाही. त्यामुळे यदाकदचित आम्हाला ३१ जानेवारीपर्यंत कोणताही निरोप आला नाही, तर एक तारखेला आम्ही बंद करूच. पण, एक तारखेनंतर मंत्र्यांचा प्रवास नवी मुंबईच्या खाडी पुलावरून ठरला, तर आम्ही पाच-पन्नास माथाडी कामगार घेऊन रस्त्यावर उभे राहू आणि मंत्र्यांच्या गाड्या आडवू, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT