MNS leader Raju Patil welcomes BJP workers into the Maharashtra Navnirman Sena during a party induction programme. sarkarnama
मुंबई

KDMC Politics : डोंबिवलीत कार्यकर्त्यांची 'घरवापसी', राजू पाटलांचा भाजपवर निशाणा

BJP MNS Raju Patil : काही दिवसांपूर्वी डोंबिवली तसेच नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील १४ गावांमधील काही मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांची घरवापसी झाली आहे.

शर्मिला वाळुंज

Raju Patil News : डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिका हद्दीतील १४ गावांच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतर आणि घरवापसीची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी पुन्हा मनसेत प्रवेश केला.

मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या घरवापसी कार्यक्रमानंतर त्यांनी भाजपवर जोरदार टीका करत, भाजपमध्ये गेलेल्या अनेक तरुण कार्यकर्त्यांना तेथे गेल्यानंतर पस्तावा होत असल्याचा दावा केला.

काही दिवसांपूर्वी डोंबिवली तसेच नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील १४ गावांमधील काही मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अवघ्या काही दिवसांतच त्यांनी पुन्हा मनसेत परतण्याचा निर्णय घेतला. या कार्यकर्त्यांचे राजू पाटील यांच्या हस्ते पक्षात स्वागत करण्यात आले.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राजू पाटील यांनी भाजपवर थेट निशाणा साधला. "तरुण वयात काही जण भावनेच्या भरात किंवा काही आश्वासनांना भुलून पक्ष बदलतात. मात्र, दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर वास्तवाची जाणीव होते. मनसेत कार्यकर्त्याला मोकळेपणाने काम करण्याची संधी मिळते. इतर पक्षात गेल्यावर त्यांच्या मर्यादा लक्षात येतात. त्यामुळे अनेक जण पुन्हा मनसेत परतण्याचा निर्णय घेत आहेत," असा दावा त्यांनी केला.

पुढे बोलताना त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. "भाजपमध्ये कार्यकर्त्यांना यंत्रणेप्रमाणे केवळ टास्क दिले जातात. स्वतःची भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य नसते. खोट्या गोष्टी बोलायला सांगितले जाते आणि खोटे हिंदुत्व गळ्यात मारले जाते. ही कार्यपद्धती अनेक तरुणांना मान्य नसल्याने ते पुन्हा मनसेत परतत आहेत," असा आरोप त्यांनी केला.

घरवापसीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करताना पाटील म्हणाले, "क्षणिक भावनेतून पक्ष सोडणाऱ्यांचे आम्ही मोठ्या मनाने स्वागत करतो. मात्र, आर्थिक व्यवहार किंवा पैशांच्या देवाणघेवाणीतून पक्ष सोडणाऱ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जात नाही. मनसेशी वैचारिक नाळ जपणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी पक्षाचे दरवाजे कायम खुले आहेत."

भाजप प्रत्युत्तर देणार...

डोंबिवली आणि १४ गावांच्या परिसरात या घरवापसीची राजकीय चर्चा सुरू झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर मनसेने भाजपवर केलेल्या या हल्लाबोलाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राजू पाटील यांनी केलेल्या आरोपांवर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या आरोपांना भाजपकडून काय उत्तर दिले जाते, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT