Nawab Malik
Nawab Malik Sarkarnama
मुंबई

मलिकांना उच्च न्यायालयाची तंबी; कारवाई करण्याचा दिला इशारा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मंगळवारी उच्च न्यायालयाने तंबी दिली आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविषयी माध्यमांशी बोलणं त्यांना महागात पडलं असून न्यायालयाने थेट कारवाईचा इशारा दिला आहे. आपल्या वक्तव्यांवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश न्यायालयाने मलिकांना दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दिलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे नवाब मलिक (Nawab Malik) यांना वानखेडे यांच्याविषयी बोलता येणार नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मलिकांकडून वानखेडे यांच्याविषयी एकही ट्विट करण्यात आलेले नाही. तसेच त्यांनी बोलण्याचेही टाळले होते. पण रविवारी ट्विटर स्पेसवर त्यांनी वानखेडेंवर पुन्हा निशाणा साधला होता. तसेच तीन डिसेंबर रोजी फेसबुकवरही एक पोस्ट टाकली होती. दादर चैत्यभूमीवरही त्यांनी वानखेडेंविषयी वक्तव्य केलं होतं.

त्यावरून समीर वानखेडे यांच्या वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये मलिकांवर न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा करण्यात आला आहे. वानखेडे यांच्याविषयी न बोलण्याचे प्रतित्रापत्र न्यायालयात देऊनही त्यांनी वक्तव्य केल्याचे यामध्ये म्हटले आहे. यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने मलिकांविषयी नाराजी व्यक्त केली. आहे.

न्यायालयाने मलिकांच्या वकिलांना थेट सवाल करत मलिक हे मंत्री म्हणून बोलत आहेत की वैयक्तिक हे सांगा. ते वैयक्तिक बोलत असतील तर त्यांना लगेच न्यायालयात बोलवावं लागेल, असं न्यायालय म्हणाले. त्यावर मलिक यांच्या वकिलांनी मलिक यांनी ते वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते या नात्याने केल्याचे सांगितले. न्यायालयाला हमी देऊन ही त्याचे उल्लघंन केले आहे. त्यामुळे तुमच्यावर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई का करू नये, अशी विचारणा करत न्यायालयाने मलिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. आता या प्रकरणावर 10 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्यावर उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणात एक सदस्यीय खंडपीठाने मलिकांना दिलासा दिला आहे. पण न्यायालयाचा हा निर्णय रद्द करण्याची मागणी मलिकांनीच केली होती. या मागणीवर वानखेडे यांनीही आक्षेप घेतलेला नाही.

ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. मलिक यांना आपण व आपल्या कुटुंबीयांबद्दल बोलण्यास निर्बंध घालावेत, अशी मागणीही वानखेडे यांनी केली होती. यावर एक सदस्यीय खंडपीठाने मलिक यांच्यावर पूर्णपणे निर्बंध घालता येणार नाहीत. परंतु, वानखेडे यांच्याबद्दल जाहीरपणे विधाने करताना मलिक यांनी योग्य काळजी घ्यावी, असा निर्णय देत मलिकांना दिलासा दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT