Retired Police  Inspector Arun Chavan
Retired Police Inspector Arun Chavan Sarkarnama
मुंबई

अरूण चव्हाणांनी कार चोरट्यांचा माग काढला अन् बॉम्बस्फोटाच्या कटाचा झाला पर्दाफाश

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अहमदाबाद शहरात २००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा (Ahmedabad serial blast) १४ वर्षांनंतर निवाडा झाला. विशेष न्यायालयाने ३८ दोषींना मृत्युदंडाची तर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या बॉम्बस्फोटांमागे इंडियन मुझाहिद्दीन (IM) या दहशतवादी संघटनेचा हात होता, हे कार चोरीच्या तपासातून उघड झाले होते. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या हल्ल्याच्या मुळापर्यंत जाता आले.

बॉम्बस्फोट झाले त्यावेळी ‘आयएम’ या संघटनेविषयी यंत्रणांना फारशी माहिती नव्हती. त्यामुळे सुरूवातीचे बरेच दिवस बॉम्बस्फोटांबाबत यंत्रणा चाचपडत होत्या. पण मुंबई गुन्हे शाखेतील (Crime Branch) तत्कालीन पोलीस निरीक्षक अरूण चव्हाण (Arun Chavan) यांची या प्रकरणाचा छडा लावण्यातील भूमिका महत्वाची ठरली. त्यांनी सुरूवातीला केलेल्या तपासातूनच पुढील धागेदोरे मिळत गेले. चव्हाण हे सेवेतून निवृत्त झाले आहेत.

बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेल्या कार नवी मुंबईतून चोरल्याचा संशय होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूण चव्हाण यांनी बॉम्बस्फोटाआधी महिनाभरात झालेल्या कारचोरीची माहिती काढून दोघांना ताब्यात घेतलं. अफजल उस्मानी (Afzal Usmani) या व्यक्तीच्या सांगण्यावरून कार चोरल्याची माहिती त्यांनी दिली. चव्हाण यांनी त्यांनुसार फिल्डींग लावत २४ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मऊ जिल्ह्यातून उस्मानीच्या मुसक्या आवळल्या.

उस्मानी या ताब्यात घेतल्यानंतर बॉम्बस्फोटातील आयएमचा सहभाग उघड झाला. उस्मानी हा या ऑपरेशनमध्ये सहायक म्हणून काम करत होता. पण तोपर्यंत सर्वच तपास यंत्रणांना अंधारात चाचपड. चव्हाण हे उस्मानीपर्यंत पोहचले नसते तर कदाचित आयएमपर्यंत लवकरच पोहचणे शक्य झाले नसते, असेही तत्कालीन अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. तपासात स्पष्ट झाले की, चोरट्यांनी उस्मानीच्या सांगण्यावरून वाशी आणि नेरूळ येथून दोन-दोन कार चोरल्या होत्या. या कार अहमदाबाद आणि सूरत येथे पाठवण्यात आल्या. अहमदाबादमधील कारमध्ये स्फोट झाले. पण सूरत येथील कारमध्ये स्फोटकांपर्यंत तपास यंत्रणा पोहचल्या. त्यावरून दोन चोरट्यांचा माग काढून उस्मानीपर्यंत पोहचता आले.

उस्मानी याने चौकशीदरम्यान रियाझ भटकळ आणि मोहम्मद सादिक, आरिफ बद्र यांची माहिती दिली. या तपासात आयएमचा २००० सालच्या सुरूवातीपासून झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये हात असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणांना समजले. दिल्लीत २००५ मध्ये करण्यात आलेल्या त्यांचा तोपर्यंतचा मोठा हल्ला होता. २००७ मध्ये वाराणशी त्यानंतर जयपूर, अहमदाबादमध्येही त्यांनी स्फोट घडवून आणले. त्यामुळे मुंबई पोलीस व चव्हाण यांनी त्यावेळी केलेल्या तपासाला खूप महत्व प्राप्त झाले होते.

छोटे धागेदोरे महत्वाचे

अहमदाबाद बॉम्बस्फोटातील आरोपींना शिक्षा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले, आम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे या प्रकरणाचा निकाल योग्यप्रकारे लागला, याचा आनंद आहे. कोणतीही छोटे धागेदोरे मोठ्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी महत्वाचे असतात, असंही चव्हाण म्हणाले.

अहमदाबाद बॉम्बस्फोटात ५६ जणांचा मृत्यू

अहमदाबाद बॉम्बस्फोटांच्या भीषण मालिकेमध्ये ५६ जण ठार झाले होते तर २०० जण जखमी झाले होते. २६ जुलै २००८ रोजी अवघ्या ७० मिनिटांच्या अवधीमध्ये शहरभर २१ स्फोट झाल्याने अवघा देश हादरला होता. न्यायालयाने सात हजार पानी निकालपत्रामध्ये हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत ३८ जणांना मरेपर्यंत फाशी आणि अन्य अकराजणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT