Priyanka Chaturvedi Chandrakant Khaire
Priyanka Chaturvedi Chandrakant Khaire  Sarkarnama
मुंबई

चतुर्वेंदींना राज्यसभा मिळाल्यानंतर आदळाआपट करणाऱ्या चंद्रकांत खैरेंचे यावेळी काय होणार?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळात जोर पकडला आहे. यात ६ पैकी ५ जागांवर भाजपचे २, शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा प्रत्येकी १ खासदार निवडून येवू शकतो. त्यामुळे उर्वरित सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje) यांनी आपली स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र अद्याप कोणत्याच राजकीय पक्षाने आपला पाठिंबा त्यांना जाहीर केलेला नाही. (Shivsena Latest News)

अशात शिवसेनेने देखील काल सहावी जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मंत्री अनिल परब (Anil parab) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) या दोघांनीही याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा असणार नाही, हे स्पष्ट आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा करण्यापूर्वीच शिवसेनेने त्यांना पक्ष प्रवेशाची ऑफर दिली होती, ती ऑफर अद्याप देखील कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. (Rajysabha Election latest news)

मात्र संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश न केल्यास शिवसेनेतील कोणाला राज्यसभेचे तिकीट मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातही सर्वात जास्त चर्चा आहे ती औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नावाची. कारण गत राज्यसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून आलेल्या आणि मूळच्या महाराष्ट्रीयन नसलेल्या प्रियांका चतुर्वेंदी यांना संधी मिळाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

त्यावेळी राज्यसभा उमेदवारीवर चंद्रकांत खैरे म्हणाले होते की, "मला नाही, माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती. आदित्यसाहेबांना आवडलं नाही. मी माझं काम करत राहीन. मी बाळासाहेबांसोबत अनेक वर्षे काम केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतही काम केले. पण त्यांना आता वाटतं की, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. मात्र मी स्मशानात जाईपर्यंत शिवसैनिकच राहीन. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे, संधी मिळाली असती तर लढायला बळ मिळालं असतं," अशा शब्दात खैरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

पुढील काही दिवसांमध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. अशातच तिथे एमआयएमचा खासदार निवडून आल्याने शिवसेनाला शह बसला आहे. सोबत महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सभा घेत मनसेने देखील औरंगाबादमध्ये ताकद लावली आहे. यासाठी पुन्हा एकदा शिवसेनेला आपली ताकद वाढविण्याची गरज आहे. त्यामुळेच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे यावेळी काय होणार असा सवाल विचारला जात आहे.

महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. यात शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस ४४, बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २, प्रहार १, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, शेकाप १, अपक्ष ८ अशा आमदारांचा समावेश आहे. या संख्याबळानुसार शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी १ खासदार निवडून येवू शकतो. तर शिल्लक मत २७ आणि इतर अधिक अपक्ष असे १६ मिळून चौथा खासदार देखील निवडून येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT