Uddhav Thackeray and Eknath Shinde Google
मुंबई

Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंचा पुन्हा ठाकरेंना धक्का; आघाडी सरकारच्या 'या' महत्त्वाकांक्षी योजनेला 'ब्रेक'

Mahayuti Vs Maha Vikas Aaghadi : या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचाही संशय....

Deepak Kulkarni

Mumbai News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून खाली खेचत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपचं महायुती सरकार अस्तित्वात आले. या सरकारने ठाकरेंच्या अनेक विकासकामांसह अनेक महत्त्वाकांक्षी योजनांना स्थगिती दिली. यामुळे महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून सातत्याने शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येते.

मात्र, याचदरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना धक्का देतानाच महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेल्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ब्रेक दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली होती. ही ठाकरे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना होती. या योजनेची जोरदार चर्चा रंगली होती. सर्वसामान्यांसाठी दहा रुपयांत भोजन हा कौतुकास्पद निर्णय ठरला होता. पण या योजनेविषयी अनेक तक्रारी समोर आल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचाही संशय महायुती सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे सरकारने पुण्यातील तब्बल 51 शिवभोजन थाळी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. आता पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये फक्त 35 केंद्रच सुरू असणार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये (Maha Vikas Aaghadi) पुणे जिल्ह्यात एकूण 86 शिवभोजन थाळी केंद्र सुरू होती. आता केवळ 35 केंद्रच सुरू आहेत.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने कारभार हाती घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा शिंदे सरकारला संशय आहे. त्यामुळे ही योजना बंद करण्याचा विचार सुरू होता. परंतु यावरन टीका झाल्यानंतर सध्यातरी ही योजना बंद होणार नाही. मात्र, ऑडिटनंतर या योजनेत बदल केले जातील.

शिवभोजन थाळी (ShivBhojan Thali) केंद्र चालकांना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. शिवभोजन थाळीत एक वाटी भाजी, दोन चपात्या, भात व वरणाचा समावेश आहे. राज्य सरकारकडून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान दिले जात होते. ग्रामीण भागातील केंद्र चालकांना एका थाळीमागे 50 रुपये आणि शहरी भागातील थाळी चालकांना 35 रुपये अनुदान देण्यात येत होते.

गरिबांना, गरजूंना सहज व अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करण्यासाठी राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले होते. शिवभोजन थाळी केंद्र स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, हॉटेल चालक आदींना चालवण्यासाठी देण्यात आली आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT