Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde On Uddhav Thackeray : मुख्यमंत्री शिंदे विधानसभेत आक्रमक; उद्धव ठाकरेंना टोमणे मारत धू-धू धुतले

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या खास टोमण्यांनी सत्ताधारी पक्षातील नेते, आमदारांना घायाळ करतात. ठाकरेंने या टोमणे अस्त्राने अनेक नेत्यांचा पाणउतारा केल्याने वादही झाल्याची उदाहरणे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपल्या भाषणात ठाकरेंना त्यांच्याच टोमण्यांच्या भाषेत धू-धू धुतले आहे. यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात पुन्हा खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत. (Latest Political News)

महाविकास आघाडीच्या सरकारमधील उद्धव ठाकरेंची कृती, कोविड घोटाळा, आताची खेकड्यांची भाषा, कलंक, महापालिकेतील भ्रष्टाचार आदी मुद्द्यांवरून मुख्यमंत्री शिंदेंनी टोमण्यातूनच ठाकरेंचा समाचार घेतला आहे. खासदार संजय राऊतांनी घेतलेल्या एका मुलाखतीत ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकार मुसळधार पावसाने नाही तर खेकड्याने फोडल्याचा टोला शिंदेंना लगावला होता. याचा संदर्भ देत शिंदेंनी आज ठाकरेंवर पलटवार केला आहे. शिंदे म्हणाले, "सरकार गेल्याने त्यांच्याकडे 'रोकडे' येणे बंद झाले, त्यामुळे त्यांना 'खेकडे' आठवले." शिंदेंच्या या टोल्याने सभागृहातील सर्वांनाच हसू आवरता आले नाही.

सध्या सरकारच्या वतीने 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम राज्यभर राबवला जात आहे. यावर ठाकरेंनी वारंवार शेलक्या शब्दात टीका केली आहे. याचा सामाचार घेतला शिंदे म्हणाले, "आज सरकार लोकांच्या दारात जाऊन काम करत आहे. यापूर्वीचे सरकार आपल्याच दारी होते. 'फेसबुक'च्या माध्यामातून यापूर्वीचे मुख्यमंत्री काम करत होते. आम्ही मात्र 'फिल्ड'वर जाऊन लोकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवत आहोत. हे सरकार 'ऑनलाइन' नाही तर 'फिल्ड'वरील आहे."

मध्यंतरी राज्यातील राजकारणाचा कंलक या शब्दावरून दर्जा घसरल्याची टीका होऊ लागली होती. यावरही शिंदेंनी आपल्या भाषणात बोट ठेवले. शिंदे म्हणाले, "महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर बोलण्याचा दर्जा घसरून टोमण्यांचा जमाना आला. महाविकास आघाडीत आपल्या अहंकारामुळे अनेक प्रकल्प रखडवले होते. ते आम्ही सुरू करून पूर्ण होण्याच्या मार्गावर नेऊन ठेवले. आम्ही कुणालाही दोष देणार नाही पण आम्ही जनतेत जाऊन ठोस काम करणार आहोत."

शिवसेना फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांवर ५० खोके एकदम ओक्के अशी टीका केली जात होती. यावर शिंदेंनी आम्ही खोकेबाज तर तुम्ही धोकेबाज म्हणत शंभर खोके मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून राज्यातील रुग्णांना वाटल्याची माहिती दिली. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करून त्यांना धोका दिल्याचा पलटवारही शिंदेंनी यावेळी ठाकरेंवर केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT