Eknath Shinde and Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde news : 'हे तर हिंदुत्वाचे मिलावट राम' ; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका

राहुल क्षीरसागर

Thane News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील समाजवादी पक्षाच्या 21 संघटनांची बैठक मुंबईत घेतली होती. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे यांना लक्ष केले. काँग्रेसला बाळासाहेबांनी गाडा असे म्हटले होते, त्याच काँग्रेसला यांनी डोक्यावर घेतले, त्यावेळी त्यांनी हिंदुत्व सोडले. तसेच मतदारांचा विश्वास घात केला, जशी अन्नांमध्ये मिलावट होते, तसेच हे हिंदुत्वाचे मिलावट राम आहे, अशी जोरदार टीका शिंदेंनी केली.

मुख्यमंत्री शिंदे ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तसेच काँग्रेसला (Congress) डोक्यावर त्यानंतर आता खांद्यावर घेतले जात आहे. याशिवाय आणखी सर्वांना जवळ केले जात आहे. त्यांना जनता माफ करणार नाहीच, पण बाळासाहेब सुद्धा माफ करणार नाही, असा हल्लाबोल शिंदे यांनी केला. शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केल्याशिवाय यांचा दिवस जात नाही. मोदी यांनी देशाला इतक्या उंचीवर नेणून ठेवले आहे. हीच त्यांची आता पोटदुखी होऊन बसली आहे. जी २० चे अध्यक्षपद देशाला मिळाले, शनिवारी ऑलम्पिकची पहिल्यांदा बैठक झाली.

मात्र, ज्यांना कावीळ झालेली असते, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली की, दखल घेतली जाते, असेच काम सध्या ते करत आहेत. खरे म्हणजे ज्यांनी नेहमी बाळासाहेबांच्या विरोधात भूमिका घेतली. बाळासाहेबांना विरोध केला त्यांच्या विचारावर आणि बाळासाहेबांच्या कार्यपद्धतीवर आरोप केले, अशा सर्व लोकांना जवळ करण्याबरोबर त्यांना कवटाळण्याचे काम उद्धव ठाकरे हे करत आहेत, असा जोरदार घणाघात केला.

हिंदुत्वाचे बनावट मुखवटे पांघरणाऱ्यांचे मुखवटे आगामी निवडणुकीत मतदार टराटरा फडतील आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देतील असेही यावेळी शिंदे म्हणाले. ज्यांनी बाळासाहेबांवर खालच्या पातळीवर टीका केली. त्यांचे हे गळाभेट घेत आहेत. गोडवे गाताहेत. तसेच २०१९ मध्ये स्वतः मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेस सोबत गेले आणि घरोबा केला. तेंव्हापासून हिंदुत्ववादी म्हणण्याचा नैतिक अधिकार त्यांना राहिलेला नाही.

निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी किती पक्ष एकत्र केले. ज्यांनी बाळासाहेबांवर टीका केली त्यांना आगामी निवडणुकीत जनता घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. तसेच महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. घरी बसून कारभार करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता मतदान करत नाही. अशी खोचट टीका करताना, रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणाऱ्यांना जनतेकडून मतदान केले जाते. असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांना कितीही विरोध केले तरी २०२४ मध्ये सर्वाधिक मताधिक्याने मोदी हेच देशाचे पंतप्रधान होतील. असा ही विश्वास त्यांनी व्यक्त करताना, याबद्दल कोणालाही सांगण्याची गरज नाही ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ असल्याचेही सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT