Ajit Pawar, Hasan Mushrif, Uddhav Thackeray
Ajit Pawar, Hasan Mushrif, Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

ना दादा, ना वळसे पाटील; शिवसेना आमदारांचे प्रमुख लक्ष्य ठरले हसन मुश्रीफ

ज्ञानेश सावंत : सरकारनामा

मुंबई : मुख्यमंत्रीपद असूनही सत्तेत आम्ही आमदारांनी 'चोरीछुपे' का राहायचे, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापुढे मांडून निधी वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मंत्री 'पाप' करीत असल्याचे 'जुनीच कॅसेट' शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांनी वर्षावरच्या बैठकीत वाजवली. मात्र, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हेच सुडापोटी आमची अडवणूक करून मतदारसंघातील शिवसेनाविरोधकांना 'बळ' देत असल्याचा आरोप केला. एकूण मुख्यमंत्र्यासमवेतच्या बैठकीत बहुतांशी आमदारांनी पवार आणि मुश्रीफ यांच्याच नावाने गळे काढले. आमदार अनिल बाबर, शहाजी पवार, अशिष जैस्वाल, अनिल राठोड हे आमदार राष्ट्रवादीच्या तक्रारी करण्यात आघाडीवर राहिले.

आमदारांच्या मागण्या आणि त्यावरच्या उपायांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठक घेतली. बैठकीला सुरवात होताच, आमदारांनी निधी वाटपाचा जुनाच मुद्दा काढला आणि त्यावर गा-हाणे मांडली. आमदारांचा तळमळ पाहून ठाकरे हे साऱ्यांनाच बोलू देत राहिले. ही संधी साधून बाबर, पवार, जैस्वाल, राठोड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री शिवसेनेला कसे पाण्यात पाहतात, अशा उदाहरणांची मालिकाच मांडली.

'विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराची कामे लगेचच होतात. ग्रामविकास खात्याचा निधी त्यांना थेट दिला जातो. अर्थखातेही मागे नाही. त्यापलीकडे जुन्या मैत्रीतून सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाणही राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोकळ्या हाताने मदत करीत आहेत. अशा शिवसेनेच्या आमदारांना चकराच माराव्या लागतात, अशा ढीगभर तक्रारी आमदारांनी मुख्यमंत्री ठाकरेंच्या कानावर घातल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांत वाद पेटला असतानाच शिवसेनेचे आमदारही आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशेषतः पवार आणि मुश्रीफ यांच्या नावाने बोट मोडत आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेसकडून आता राष्ट्रवादीला 'टार्गेट' केले जात असल्याचे चित्र आहे.

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना तिप्पट निधी मिळाल्याचा मुद्दा काढून शिवसेना आमदारांनी नाराजी मांडली होती. गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक निधी घेतला आहे; यापुढच्या अडीच वर्षात शिवसेना आमदारांना अधिक निधी देतील का, याचे उत्तरही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चाली जाणून असलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी तुर्त काही न बोलता, आता थेट ठाकरे स्टाइलने पावले उचलण्याची भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांत शहकाटशहाचे राजकारण पाहायला मिळणार असल्याचे शिवसेनेच्या पवित्र्यावरून दिसत आहे.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेकडे एक जागा निवडून येण्याची क्षमता असतानाही दुसऱ्या म्हणजे, सहाव्या जागेचाही आग्रह ठाकरे यांनी धरला आहे. तर अपक्ष उमेदवार राहणाऱ्या संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची राष्ट्रवादीची तयारी असल्याचे बोलले जात आहे. त्यात सहावा उमेदवार देण्याची घोषणाही शिवसेनेने केली. या मुद्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT